Month: August 2024

 महाराष्ट्रातील रेशन दुकानात आनंदाचा शिधा गायब

ओरिसात रेशन दुकानात २४ तास धान्य ए टी एम   मुंबई / रमेश औताडे ओरिसाची राजधानी भुवनेश्वर मध्ये देशातील पहिले धान्य एटीएम (धान्य वितरण मशीन) लाँच करण्यात आले. तर महाराष्ट्रातील दुकानातून घोषित केलेला आनंदाचा शिधा गायब होत आहे. अशी भ्रष्टाचारी अवस्था असताना, देशातील ८० कोटी जनतेला रेशन व्यवस्था परिपूर्ण असल्याची केंद्रीय शिधावाटप यंत्रणा जाहिरात करत आहे. असा आरोप करत रेशन हक्क समिती ने खंत व्यक्त केली आहे. अनेक शिधावाटप दुकानात सर्व्हर डाऊन मुळे रांगेतील ग्राहक मोकळ्या हाताने घरी जातात. सर्व्हर आला तर वीज जाते, वीज आली तर थम मशीन बंद पडते, अशी तांत्रिक अडचण असताना सडके किडके धान्य, दुकानदार वेळेवर येत नाही, शिधा घेतल्यानंतर पावती देत नाही असे प्रकार अनेक दुकानात पाहायला मिळत आहेत. मागील श्री रामनवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा अनेक दुकानात मिळाला नाही. आता गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. नुसत्या घोषणा करण्यापेक्षा शिधा वाटप दुकानात किमान कॅमेरे तरी लावा जेणे करून मनमानी उजेडात येईल. ओरिसामध्ये आठवड्याचे सात दिवस २४ तास शिधा देणारी ए टी एम मशीन व महाराष्ट्रात मात्र आंधळ दळतंय अन् कुत्रे पीठ खातंय अशी अवस्था आहे.

 ठाण्यात राडा

शिवसेना मनसे आमने सामने   ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शनिवारी सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतनात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मोठ्यासंख्येने पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्येकर्त्यांनी गर्दी केली होती. बीड मध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्यामुळे आक्रमक झालेल्या ठाण्यातील मनसैनिकांनी गडकरी रंगायतन परिसरात गोंधळ घालण्यासाठी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांचा ताफा ठाण्यात येताच, काही मनसैनिकांनी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेसाठी येत असताना मुलुंड चेक नाक्याजवळ ठाकरे यांच्या गाडीवर  शेण फेकले. तसेच पुढे त्यांचा ताफा आल्यानंतर ताफ्यावर नारळही फेकण्यात आले पाच ते सहा जण मोठ्या पिशवीतून नारळ भरुन घेऊन आले होते. भर रस्त्यात उद्धव यांच्या ताफ्यावर हे नारळ फेकले जात होते. यावेळी सर्वसामान्य नागरिक देखील वाहनातून प्रवास करत होते. त्यामुळे नारळ नागरिकांना लागून दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यानंतर त्यांची गाडी गडकरी रंगायतन मध्ये पोहोचताच त्यांच्या गाडीच्या मागून मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या गाडीवर बांगड्या फेकण्यास सुरुवात केली. यावेळी मनसे आणि उद्धव सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी नौपाडा पोलीसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसे व शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ अशाच्या घोषणा दिल्या. तसेच उद्धव ठाकरे यांना पुन्हा कधी ठाण्यात येऊ देणार नाही, असा इशारा देखील दिला. आमचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोटारीसमोर शुक्रवारी उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यामुळे मनसैनिकांमध्ये खदखद होती. आमच्या १५० ते २०० मनसैनिकांनी आंदोलन करून उद्धवसेनेला चोख प्रत्युत्तर दिले. मनसे जशास तसे उत्तर द्यायला मागेपुढे पाहणार नाही.- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे, ठाणे-पालघर 000000

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचा एक सलाम वर्दीला

राजेंद्र साळसकर     मुंबई : आपण जे स्वच्छंदी जीवन जगतो,निवांतपणे निद्रासुख घेतो त्यामागे असंख्य दृश्य- अदृश्य पाठिराख्यांचे हात असतात हे कदापि विसरून चालणार नाही.हे पाठिराखे आपल्यासाठी देवदूतासमान आहेfत.आपल्या देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून ऊन,वारा,पाऊस,थंडी कशाचीही पर्वा न करता अहोरात्र जागून त्याचबरोबर वेळप्रसंगी आपल्या प्राणांची बाजी लावून सीमेचं रक्षण करतात ते आपल्या देशाचे जवान त्याचप्रमाणे कोणाही नागरिकाला कोणताही गंभीर आजार असो त्या रूग्णाला वाचविण्यासाठी आपले सारे वैद्यक कसब पणाला लावून व त्याची अहोरात्र सेवासुश्रुषा करून त्याचे प्राण वाचवितात हेे आपल्या साठी माणसातील देवमाणूसच आहेत.या देवमाणसाची प्रचिती आपण सर्वांनी कोरोना महामारी काळात घेतली आहेच. अशा या माणसातील देव माणसांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहेच.म्हणूनच आपल्याला अभिमानास्पद  असणा-या माणसातील देव माणसाची सेवा म्हणून त्यांच्या युनिफॉर्मची (वर्दीची) ड्रायक्लिनींग सुविधा १५ऑगष्ट ह्या स्वातंत्र्यदिनी केवळ एक रूपया सेवामूल्य घेऊन करण्याचे कॉर्पोरेट तसेच मध्यम वर्गात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आयन फिल या लॉंड्री सेवा देणा-या संस्थेमार्फत ड्रायक्लिनींग सेवा देण्यात येणार आहे.आयन फिल ने गतवर्षीही ही योजना राबविली होती तेव्हा यास प्रचंड प्रतिसाद लाभला होता. वर्दीतील देवमाणसांच्या कार्याला सलाम म्हणून यंदाच्या स्वातंत्र्यदिनीही ही योजना राबविण्याचे ठरविले असून देशाची सेवा करणारे जवान, पोलीस,डॉक्टर,परिचारिका यांनी या ड्रायक्लिनींग सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आयन फिल चे उदय पवार यांनी आग्रहाचे आवाहन केले आहे.   अधिक माहितीसाठी ७३०४६७८४८४/८४२२८९८९०२ या क्रमांकावर संपर्क करावा. 0000

मर्द असता तर समोर आले असते, हल्ला करून पळून का गेले?

ठाकरे गटाचे राजन विचारे यांची मनसेवर टीका     ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकून हल्ला केला. तसेच गडकरी रंगायतन परिसरात त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर ठाण्यात ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. महिलांना पुढे करून हा प्रकार झाला आहे. मर्द असता तर समोर आला असतात. पळून कशाला गेलात, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आले होते. यावेळी नितीन कंपनी भागात मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याच्या दिशेने नारळ फेकले होते. या हल्ल्यात ताफ्यातील एका वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच गडकरी रंगायतन परिसरात उद्धव ठाकरे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. रात्री उशीरा ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच मनसेच्या या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. महिलांना पुढे करून हा प्रकार झाला आहे. मर्द असता तर समोर आला असतात. पळून कशाला गेलात. गडकरी रंगायतनमध्ये दोन ते तीन हजार शिवसैनिक होते. हे शिवसैनिक खाली उतरले असते तर वेगळ काही घडल असतं, शिवसैनिकांवर हल्ले करण्याची भाषा करू नका, असे राजन विचारे म्हणाले. लहान मुले सुद्धा दगडफेक करून पळून जातात. तसाच हा प्रकार आहे. ही मर्दाची लक्षणे नाहीत. नारळ फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे तिथून जीवघेत पळत सुटले अशी टीका विचारे यांनी केली. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. स्टंट करण्यासाठी, पक्षासाठी काही तरी करतोय हे दाखविण्यासाठी असले प्रकार करण्यात आले आहेत. नारळ फेक करताना सर्वसामान्य नागरिक ये-जा करत होते. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना हे नारळ लागून गंभीर दुखापत झाली असती. त्याला कोण जबाबदार असते असा प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केला.

मुंबई-नाशिक महामार्गावर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर करण्यात येणाऱ्या उपायोजनांविषयीची…

 प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने राज्य शासन यावर्षी देणार

७५ हजार गोविंदांना प्रत्येकी १० लाखाचे विमा कवच ! अनिल ठाणेकर     ठाणे : परंपंरागत दहिहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या गोविंदाना विमा संरक्षण मिळावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती मान्य करून दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदाना, राज्य शासन यावर्षी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून ७५ हजार गोविंदाना प्रत्येकी १० लाखाचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे. प्राचीन काळापासून सुरू असलेला व महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्वाचा सण गोकुळाष्टमी  म्हणजेच दहिकाला उत्सव. हा सण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून मुंबई-ठाणे शहरांबरोबरच महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवात १५ ते ४० वयोगटातील तरूण-तरूणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. दहिहंडी (गोविंदा) उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई-ठाण्यातील हजारो गोविंदा गोकुळअष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी दहिहंडीचे आयोजन करण्यात आलेले असते त्या ठिकाणी थरावर-थर चढवून हंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचप्रमाणे या उत्सवात महिलांची देखील गोविंदा पथके सहभागी होत असतात.दरवर्षी गुरूपोर्णिमेच्या दिवसापासून ते गोकुळाष्टमीच्या दिवसापर्यंत गोविंदा थरावर-थर चढवून हंडी फोडण्याचा सराव करीत असताना त्यामध्ये अनेक गोविंदा जायबंदी होत असतात, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा असतो. सर्व गोविंदा पथकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्यावर होणार्या औषधोपचाराचा खर्च या गोविंदा मंडळास परवडत नाही. तसेच याकरिता काही सेवाभावी संस्था मदतही करतात तरीही काही ठिकाणी औषधोपचार वेळेवर न मिळाल्याने काही गोविंदा मृत्यू पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परिणामी अपघातग्रस्त गोविंदाना व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे जर विम्याचे कवच मिळाल्यास गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे. त्यानुसार ७५ हजार गोविंदाना ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. शासन निर्णयानुसार दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचा अपघाती मृत्यु झाल्यास परिवाराला दहा लाख मिळतील. तसेच दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास दहा लाख रूपये, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास पाच लाख तसेच कायमस्वरूपी पुर्ण अपंगत्व आल्यास दहा लाख रूपये त्याचप्रमाणे अपघातामुळे रूग्णालयीन खर्च एक लाखापर्यंत देण्यात येणार आहे. त्यामुळे आता गोविंदाना विमा कवच मिळणार असल्याने गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या सुमारे ७५ हजार गोविंदांना दहा लाखाचा विमा संरक्षण शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्यामुळे दहिहंडी समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पाठपुरावा करणारे आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.

सर्वद फाऊंडेशनतर्फे डहाणूत आदिवासी  दिनाचे आयोजन

दिवासी बांधवांचा उदंड प्रतिसाद     मुंबई :  जागतिक  आदिवासी  दिनानिमित्त सर्वद फाऊंडेशनने डहाणू  मधील सारणी याठिकाणी  आदिवासी  नृत्यस्पर्धा आयोजित  केली  होती कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे पोलीस  पाटील नाना लक्ष्मण  डगला यांनी श्रीफळ वाढवून आदिवासी  पारंपरिक  पद्धतीने  केले . यानंतर  सारणी गावच्या  ग्रामस्थांनी सर्वद फाऊंडेशनचे पालघर जिल्हा  सचीव श्री. अमीत हिरे, पालघर जिल्हा  उपाध्यक्षा श्रीमती  रूपाली राऊत, सर्वदचे सल्लागार डॉ. सी. पी. देशमुख , सर्वदच्या संचालिका डॉ.. सुचिता पाटील यांचे पुष्प देऊन  स्वागत  केले .यानंतर  सर्वद फाऊंडेशन संचालिका डॉ.. सुचिता पाटील यांनी  आदिवासी  दिनाच्या सर्वांना  शुभेच्छा देऊन  आदिवासी  भाषा, संस्कृतीचे महत्त्व  विषद केले. यानंतर  वेगवेगळ्या  संघांनी तारपा नृत्य , गौरी  नृत्य , कांबड नाच, टिपरी नाच, सांगड नाच, धुमसा नाच, ढोल नाच सादर केले .सुप्रसिद्ध आदिवासी  नाटक  सोंग काढणे हेही सादर करण्यात  आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश डगला यांनी  केले. कार्यक्रमासाठी दिनेश डगला, दिनेश धर्मा डगला, दिनेश सोमण, प्रकाश पाचलकर आदि आदिवासी  मंडळीनी परिश्रम  घेतले. आदिवासी  समाजाची संस्कृती  टिकून  राहण्यासाठी  सर्वदने या कार्यक्रमाचे आयोजन करून भरघोस पारितोषिकही ठेवण्यात  आले असे श्री. अमित हिरे व श्रीमती रुपाली राऊत यांनी  पत्रकारांना सांगितले. 00000

एमएसपीसीच्या माध्यमातून फार्मासिस्ट होणार स्मार्ट

रमेश औताडे   मुंबई: महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदने  राज्यातील ४ लाख ३० हजार फार्मासिस्टला जगभरात औषध क्षेत्रामध्ये आलेले नवीन तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा ( एआय ) च्या युगात सज्ज राहण्यासाठी व औषधांचे परिपूर्ण सखोल ज्ञान व भान येण्यासाठी ‘फार्मासिस्टची उन्नत्ती’ हा कार्यक्रम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असल्याची माहिती अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेला ७५ वर्ष झाली असून या अमृत महोत्सवानिमित्त नवीन अद्ययावत वास्तूत हा भव्य दिव्य कार्यक्रम १३ ऑगस्टला कालिदास नाट्यगृह येथे होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धर्मराव बाबा अत्राम,  कॉन्सील ऑफ इंडिया, नवी दिल्ली अध्यक्ष डॉ माँटू बुमार पटेल व अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. ००००

घरोघरी तिरंगा अभियान देशप्रेमाचा जागर- किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : आपल्या राष्ट्र ध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाचा जागर होणार आहे. हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून प्रभावीपणे राबविले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि अलिबाग नगरपालिका यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके, उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी भालेराव, अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसिलदार विक्रम पाटील, गट विकास अधिकारी उत्तम धाईगडे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. शाममराव कदम, देशमुख, अलिबाग नगरपालिका मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात यावर्षीही अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार आहे. मोठया उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सातत्याने त्यागाची आणि बालिदानाची आपल्याला सतत जाणीव करून देईल. रॅली, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून हे अभियान साजरे करायचे आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास जावळे यांनी व्यक्त केला. तिरंगा पदयात्रेस जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. तसेच त्याठिकाणी असलेल्या घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. यावेळी जावळे यांनी उपस्थितांना तिरंगा प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000