अनिल ठाणेकर

ठाणे : विकासकामांसाठी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील मिठागर विभागाच्या जमिनी मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्यासंदर्भात ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पियुष गोयल यांनी राज्य शासन आणि मीरा भाईंदर पालिकेला प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासात मोठा अडथळा ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या मिठागर विभागाच्या जमिनीचा मुद्दा खासदार नरेश म्हस्के यांनी जुलै महिन्यात लोकसभेत `शून्य प्रहर’ आणि नियम ३७७ च्या आधारे उपस्थित केला होता. या जमिनीमुळे प्रस्तावित रस्ता रुंदीकरण, प्रस्तावित नवीन रस्ते, प्रस्तावित नवीन स्टेडियमचे काम रखडले आहे. जमीन हस्तांतरित न झाल्याने शहराचा विकास खुंटला असल्याची बाब नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती. या मुद्याची तात्काळ दखल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी घेतली आहे. २७ ऑगस्ट २०२४ रोजीचे तसे पत्र श्री. गोयल यांनी खासदार नरेश म्हस्के यांना पाठविले आहे. सुधारित अंतर्गत धोरण मार्गदर्शक तत्त्वे २०२४ या विभागाने अलीकडेच OM क्रमांक पी-३४०२९/११/२०१८ -सॉल्ट-पार्ट-I (इ-५००४८) दिनांक २३.०८.२०२४ आणि विनंत्यांद्वारे जारी केली आहेत. यापुढे मिठाच्या जमिनीचे हस्तांतरण नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार विचारात घेतले जाणार आहे. मीरा भाईंदर पालिकेने राज्य शासनाच्या माध्यमातून प्रस्ताव पाठविण्याची सूचना या पत्रकाद्वारे केली असून राज्य शासनाशीही पत्रव्यवहार करणार असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रात म्हटले आहे. शहराच्या विकासासाठी मिठागर विभागाच्या जमिनी मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सकारात्म पावले उचलल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *