मुंबईः वाढत्या आव्हानांमुळे सशस्त्र दलांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे झालेल्या पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्स दरम्यान रशिया युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष आणि बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी हा सूचक इशारा दिला.
जागतिक अस्थिरता असूनही भारतात शांतता आहे. मात्र, सध्या वाढत असलेल्या आव्हानांमुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. अमृतकाळात आपण आपली शांतता अबाधित राखणे महत्त्वाचे आहे. आपण वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर लक्ष ठेवले पाहिजे आणि भविष्याभिमुख होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे मजबूत राष्ट्रीय सुरक्षा धोरण असायला हवे, असे मत त्यांनी मांडले. भारत एक शांतताप्रिय राष्ट्र आहे. शांतता टिकवून ठेवण्यासाठी सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार असणे आवश्यक आहे. संयुक्त लष्करी दृष्टीकोन विकसित करणे आणि भविष्यातील संभाव्य युद्धांमध्ये देशाला कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, यासाठी तयारी करण्यावर त्यांनी भर दिला पाहिजे, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.
00000
