मुंबई : रेल्वे मंत्री असताना जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे प्रकल्प राबविण्याचे जाहीर केले आणि संरक्षण मंत्री झाल्यानंतरही त्यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लक्ष दिले होते. अशा मंडळींच्या इच्छाशक्तीमुळेच हा प्रकल्प ७ वर्षाच्या आश्चर्यकारक कालावधीत पूर्ण झाला, जॉर्ज फर्नांडिस आक्रमक कामगार नेते होते, परंतु व्यक्तिगत आयुष्यात साधी राहणी होती, त्यांना अनेक भाषा येत आणि नवनवीन संकल्पना ते राबवत, त्यामुळेच त्यांच्या नावे मिळणारा पुरस्कार हा खरोखरच आनंदाचा क्षण असल्याच्या हृद्य भावना `मेट्रो मॅन ऑफ इंडिया’ पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केल्या.
भारताचे माजी रेल्वे आणि संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस स्मृती राष्ट्रीय पुरस्कार यंदा डॉ. श्रीधरन यांना बंटर भवन, कुर्ला येथे झालेल्या शानदार सोहळ्यात जयश्रीकृष्ण परिसर प्रेमी समितीच्या वतीने प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक टी. जयाकृष्ण शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित या सन्मान सोहळ्यात खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा, माजी खासदार गोपाळ शेट्टी तसेच देशभरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीधरन यांनी राबविलेले कोकण रेल्वे, दिल्ली, कोची, लखनौ, जयपूर, विजयवाडा, कोईमतूर आदी ठिकाणची मेट्रो निर्मिती ही आज काळाची गरज होती. त्यावेळी घेतलेले निर्णय धाडसी आणि अचूक असल्यामुळेच आज आपला देश गतिमान झाला आहे आणि अर्थव्यवस्था बळकट करत आहे. राष्ट्राच्या विकसनशील प्रक्रियेतील श्रीधरन यांचे योगदान सदैव प्रेरणादायी आहे, असे विचार टी. जयाकृष्ण शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळाला जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव देण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
श्रीधरन यांच्या काळात मुलभूत सोयीसुविधांच्या निर्मितीसाठी आव्हानात्मक कार्य होते, तरीही त्यांनी चिकाटीने अनेक प्रकल्प राबवले. कोकण रेल्वेच्या निर्मितीतील त्यांचे योगदान कायम राहणार आहे. भारतात खडतर अशा कोकण रेल्वे आणि विविध शहरांच्या मेट्रो रेल्वेच्या निर्मितीच्या योगदानाबद्दल त्यांना `भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, अशी भावना माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केली.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *