मुंबई : राज्यात कार्यरत अंगणवाडी केंद्रांत आता सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांत सौरऊर्जा सिस्टम देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. सौरऊर्जेचा वापर केल्याने पैसे व विजेची बचत होणार असून यासाठी टप्प्याटप्प्याने ५६४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणात यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. अंगणवाडी केंद्रांना एक किलो वॉट क्षमतेचे पारेषणविरहित (बॅटरीसह) सौरसंच टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. महाऊर्जामार्फत या संदर्भातील कार्यवाही होईल.
