बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतूनच विधानसभेची निवडणूक लढवावी यासाठी बारामतीकरच आग्रही झाले आहेत. बारातमतीतून तब्बल एक लाख अकरा हजार सातशे सात निनावी पत्रे अजित पवारांना पाठवण्यात आली असून त्यात बारामतीतूनच निवडणूक लढविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे.
बारामती विधानसभेच्या निवडणुकीबाबत वेगळा विचार करणारे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच बारामतीत केले होते. त्यानंतर बारामतीत कार्यकर्त्यांनी ही पत्रमोहीम सुरु करून अजित पवारांना आग्रह केल्याची माहीती ज्येष्ठ नेते किरण गुजर यांनी दिली आहे.
गुजर यांच्याकडे पवार यांनी बारामती शहर व तालुक्यातील बूथ कमिटीच्या पुनर्रचनेची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार गुजर यांनी तालुक्यातील ११७ गावांचा दौरा केला. शहरातील १९ प्रभागांत जात बूथ समित्यांचे पुनर्गठन केले. ३८६ बूथ कमिटीअंतर्गत ११ हजार ७६० बूथ कमिटी मेंबर झाले आहेत. या दौऱ्यात पवार हेच उमेदवार असावेत, अशी आग्रही मागणी जनतेने केल्याचे गुजर यांनी सांगितले. यासाठी एक लाखाहून अधिक विनंती पत्रे मतदारांनी दिली आहेत. निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय अजित पवार एकटे घेऊ शकत नाहीत. गेली ३५ वर्षे बारामतीकरांवर त्यांनी प्रेम केले. तितकेच प्रेम विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर केले आहे. बारामतीचा विकास पुढे न्यायचा असेल तर अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तेच येथील उमेदवार असतील. मतदारांच्या आग्रहाखातर ते निवडणूक लढवतील, असे गुजर यांनी स्पष्ट केले.
