ठाणे : ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणानंतर प्रवाशांची जितकी म्हणून अडचण होईल, तितक्या प्रमाणात अडथळे निर्माण करण्याचा विडा मध्य रेल्वे प्रशासनाने उचलल्याचे दिसत आहे. सर्वात आधी रुंदीकरणासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यानंतर वाढीव फलाटावरील प्लास्टिकचे छत बांधण्यात आले. त्यावरून पावसाचे पाणी पाझरून फलाटावर तळे साचल्याने प्रवाशांचे हाल झाले. आता फलाट आणि उपनगरी रेल्वेगाड्यांमधील अंतर कमी करण्यासाठी केलेल्या फरसबंदीमुळे मूळ फलाटाचा भाग खोलात गेल्याने अपघातांची भीती व्यक्त होत आहे.
पाच क्रमांकाच्या फलाटावर फरशा बसविण्यासाठी रेल्वे प्रसासनाला सप्टेंबरची वाट पाहावी लागली आहे, याबाद्दल प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आता केलेली फरसबंदी ही अपघातास कारण ठरेल अशीच असल्याचा आरोप कल्याण आणि डोंबिवलीतील काही प्रवाशांनी केला. फलाट क्रमांक पाचवर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि कसारासाठीचे प्रवासी उभे असतात. सायंकाळी या फलाटावर प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. अशावेळी प्रवाशांना उपनगरी रेल्वेगाड्या तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी चढउतार करताना धोक्याचे ठरू शकते. तीन फूट रुंद फरशांवर प्रवाशांना स्वत:चा तोल सांभाळणे अवघड ठरत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अर्थात रेल्वेगाडीपासून सुरक्षित अंतर ठेवून उभे राहण्यासाठी विशिष्ट रंगातील फरशी एका रेषेत बसवली जाते. तशी रचना सध्या पाच क्रमांकाच्या फलाटावर करण्यात आली आहे.
ठाणे स्थानकातील फरशांचे काम रेल्वे प्रशासनाने नीटपणे पूर्ण करावे. प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट पाचवरील फरशांचा उंचवटा कमी करण्यात येईल. त्याचप्रमाणे या फलाटावरील फरशा समतल केल्या जातील.- डॉ स्वप्नील नीला, मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी
00000
