मुंबई : राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात शनिवार दिनांक २१ सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात सलग ११ दिवस पाऊस कोसळणार
येत्या २० सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान राहणार आहे. मात्र त्यानंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तर राज्यातील नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी अलर्ट राहावं असं आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी देशासह राज्यात चांगला पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपे७ा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं शेतकरी समाधानी असल्याचे दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी राज्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळं पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे.
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात आणि विदर्भात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल तेवढी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच विरोधकांनी सरकारला या मुद्यावरुन धारेवर धरले आहे. लवकरात लवकर मदत देण्याची मागणीही केलीय.
