कत्तलखान्याविरोधात नरेंद्र मेहता आक्रमक
भाईंदर : भाईंदरच्या उत्तन येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या कत्तलखान्यास भाजपने विरोध केला आहे. हा निर्णय मंगळवारपर्यंत मागे न घेतल्यास महापालिकेच्या मुख्यालयावरून उडी मारणार असल्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. यामुळे कत्तलखान्याच्या मुद्यावरून शहरातील राजकीय वातावरण पेटणार आहे.
उत्तन येथील शासकीय जागेवर ४० कोटी रुपये खर्चून कत्तलखाना उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मिरा भाईंदर महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या कत्तलखान्यास मिरा भाईंदर भाजप पक्षाने विरोध केला आहे. या संदर्भात रविवारी माजी आमदार नरेंद्र मेहता व जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध केला. मुळात या कत्तलखान्याची गरज नव्हती. कत्तलखाना उभारण्याचा निर्णय इतक्या झटपट पद्धतीने घेण्यात आला असल्यामुळे त्यातील निविदा प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. शहराला गरज नसताना नागरिकांच्या माथी हा कत्तलखाना लादला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करून पालिका मुख्यालयावरून उडी मारणार असल्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी यावेळी दिला.
मिरा भाईंदर शहरात उत्तन येथे उभारण्यात येणारा नवा कत्तलखाना हा आमदार गीता जैन यांच्या मतदारसंघात आहे. जैन या सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्याने त्यांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप मेहता यांनी केला. या कत्तलखान्यास शहरातील जैन समाजासह अन्य स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. गीत जैन या देखील स्वतः जैन समाजातून येतात. कत्तलखान्याच्या मंजुरीमुळे गीता जैन यांचे ‘दाखवण्याचे व खाण्याचे दात वेगळे आहेत’ असे आरोप मेहता यांनी केला.
निवडणुकीत कत्तलखाना मुद्याचा वापर
मिरा भाईंदर शहरात हिंदूंसह मुस्लिम व ख्रिस्ती समाजातील नागरिक मोठ्या संख्यने राहतात. मांसहारी समाजाची संख्या जास्त असल्यामुळे शहरात स्वतंत्र कत्तलखाना उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र शहरात वर्चस्व असणार्या जैन समाजाला या कत्तलखान्यास विरोध आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन-मारवाडी समाजाला आपल्याकडे वळविण्यासाठी कत्तलखान्याला विरोधाचा मुद्दा भाजपने उचलला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याचा राजकीय फायदा उठविण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे.
