मुंबई: विधानसभा निवडणुका लढवणार आणि जोरात लढवणार आहे. माझ्या सभेत सहज म्हणून किंवा कार्यकर्त्यांचा, सहकाऱ्यांचा उत्साह वाढावा म्हणून काही बोललो नाही. विधानसभा निवडणुका आम्ही जिंकू आणि सत्ता आणू. माझी भूमिका मी मांडली आहे, असे राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विजयाचा निर्धार व्यक्त केला.
महायुती सोबत जाण्याच्या प्रस्तावावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, जर-तरची चर्चा करत नाही. मी माझ्या सभेत बोललो ते बोललो आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
टोलमाफीसाठी आमचीच मागणी होती. खूप पूर्वीपासून आम्ही ही मागणी करत होतो. टोलमुळे आपली फसवणूक होते हा मुद्दाच आम्ही मांडला. टोलमाफी झाली यामुळे मी सरकारचे आभार मानतो. उशिरा का होईना त्यांना या गोष्टी समजल्या. मला काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर टोल नाके बंद करायचे आणि निवडणुकीनंतर पुन्हा सुरु करायचे हे चालणार नाही. यापूर्वी अशा गोष्टी घडलेल्या आहेत. ही गोष्ट आता नको, नंतर सुरु केल्या. अनेकांनी शब्द दिला टोलनाके बंद करतो. सरकारने निर्णय घेतला त्याचे लोकांना समाधान आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
