मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्याविरोधात झालेल्या षडयंत्राचा गौप्यस्फोट करण्यासाठी पुस्तकाची निवड केली आहे. अनिल देशमुख लिखीत “डायरी ऑफ होम मिनिस्टर” हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर असून त्यात अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.
एक्सवर पोस्ट करत अनिल देशमुख म्हणाले, “राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी गृहमंत्री असताना षडयंत्र रचून माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. ईडी आणि सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा लावून मला १४ महिने तुरुंगात टाकण्यात आले.”
“माझ्यावर दबाव टाकून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. मला प्रचंड त्रास देण्यात आला. मी तुरुंगात असताना यावर पुस्तक लिहायला घेतले होते. ते “डायरी ऑफ होम मिनिस्टर” हे पुस्तक छापून तयार झाले असून लवकरच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत बाजारात उपलब्ध होणार आहे”, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
अनिल देशमुख त्यांच्या पारंपरिक कटोल या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नसली तरीह त्यांना तेथून उमेदवारी मिळू शकते. नोव्हेंबर २०२१ मध्ये अनिल देशमुख यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तर, त्याआधी सीबीआयकडूनही त्यांची चौकशी झाली होती. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केलेल्या आरोपांनुसार सीबीआयने एप्रिल २०२१ मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अनिल देशमुखांनी पब आणि हॉटेल चालकांकडून १०० कोटी उकळल्याचा दावा परमबीर सिंग यांनी केला होता.
अनिल देशमुख हे १९९५ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून काटोल मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. १९९५ मध्ये त्यांनी भाजप शिवसेना सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रिपदांवर काम केले. देशमुख यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक, क्रीडा आणि युवा व्यवहार, माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्रीपद भूषविले. सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रीपदही सांभाळले.
अनिल देशमुख यांनी २०१४ पर्यंत काटोल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख हे त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांच्याकडून पराभूत झाले. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व आपला बालेकिल्ला परत मिळवला होता.
