माथेरान : कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रावर तब्बल पंचवीस वर्षे राज्य केलेल्या राष्ट्रवादीचे अस्तित्व संपल्याचे या निवडणुकीमध्ये दिसून आले असून अनेक वर्षे सत्ता भोगलेल्या राष्ट्रेवादीचा एकही उमेदवार यावेळी रिंगणात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपले की काय अशा चर्चा होताना दिसून येत आहेत.
माजी आमदार सुरेश लाड यांच्या स्वरूपात राष्ट्रवादीला कर्जत मध्ये एक मोठा सक्षम चेहरा लाभला होता ज्याने येतील राष्ट्रवादी वाढविण्यास व आपले अस्तित्व राखण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती परंतु पक्षांतर्गत घडामोडीनंतर त्यांना नाईलाजाने भाजपामध्ये जावे लागले व त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ही दोन गट पडल्याने कर्जत मधील राष्ट्रवादी खिळखिळी होत चालली होती परंतु सुधाकर घारे यांनी मागील दोन अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट यामार्फत राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचे काम केले होते व या काळात राष्ट्रवादीने चांगली घोडदोड ही केली होती त्यांच्या मागे राष्ट्रवादी रायगडचे खासदार श्री सुनील तटकरे असल्याने ते लवकरच या विधानसभा क्षेत्रात उमेदवार म्हणूनही उदयास आले. राष्ट्रीवादी मध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी जरी कमजोर झाली असली तरी आपले अस्तित्व टिकवून होती व या विधानसभा जागेवर आपला हक्क राखून होती परंतु युती आघाडीच्या स्वरूपात या जागा दोन्ही शिवसेनेला गेल्याने राष्ट्रवादीमध्ये बंड पाहावयास मिळाले व खालापूर कर्जत मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा घेत राष्ट्रवादी ला सुरुंग लावला त्याचे पडसाद हळूहळू कर्जत मधील सर्वच विभागात दिसून येत असून अनेक ठिकाणी पक्ष प्रवेशाची मालिका सुरू झाली असून त्याचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीलाच बसत आहे.
या विधानसभा क्षेत्राचा केंद्रबिंदू कर्जत ठरत असल्याने सर्व घडामोडी येथेच घडत आहेत व त्याचे पडसाद पूर्ण तालुक्यामध्ये दिसून येत असतात सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन सावंत तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये सरळ सरळ लढत आहे परंतु राष्ट्रवादी सोडून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेल्या सुधाकर घारे यांनी मोठे आव्हान उभे केले असून या विधानसभा क्षेत्रामध्ये धक्का तंत्र देण्याचे काम ते करतात का हे पाहावे लागणार आहे. सध्या शरद पवार राष्ट्रवादी गट शांत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच कर्जत मध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व संपले की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
अनेक वर्षे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावरती राज्य केलेल्या राष्ट्रवादीचे अशी वाताहत का झाली व यास कारणीभूत कोण याबाबत जनता अनेकांना दोषी ठरवत असून अति महत्वकांक्षाच्या हव्यासापोटी राष्ट्रवादीच्या बालेकिल्लाचा बुरुज आज ढासळला आहे.
00000
