अशोक गायकवाड
रायगड : विधानसभा निवडणूक काळात समाजमाध्यमांवर कुठलीही पोस्ट करतांना अथवा प्रतिक्रिया देतांना तसेच पक्षाचा अथवा उमेदवारांचा प्रचार करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियावर आचारसंहिता काळात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार असून अशी पोस्ट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सोशल मिडियावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या काळात फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, गुगल, शेअरचॅट, टिकटॉक, बिग टीव्ही यासारख्या माध्यमातून खोटी माहिती देणे, अफवा पसरवणे, सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने माहिती पोस्ट करणे इत्यादी प्रकार केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. निवडणूक काळात समाजमाध्यमांचा चुकीचा वापर करू नये, असे आवाहन घार्गे यांनी केले आहे. या काळात तसेच भविष्यात देखील सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर, फोटो पोस्ट करू नयेत. देशाची एकता-सार्वभौमत्व आदींचे नुकसान करणारा, कोणत्याही संप्रदाय विरोधातला मजकूर, अफवा पसरविणारा, जीवे मारण्याची धमकी देणारा, अश्लील कंटेंट, चाइल्ड पोर्नोग्राफी आदी पोस्ट करणारा आणि ती पोस्ट शेअर करणारा अशा दोघांनाही दोषी ठरविले जाते. यापैकी काही गुन्ह्यांसाठी तुरुंगवास, सायबर क्राइमसाठी ३ वर्षे ते आजीवन कारावास तसेच एक लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो असेही घार्गे यांनी स्पष्ट केले आहे.
