नवी मुंबई : सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सक्षम करणारे केंद्र म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे ईटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र संपूर्ण देशभरात नावाजले जात असून महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी ईटीसी केंद्राला दिवाळी सणानिमित्त भेट देत दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तींसमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्या चेह-यावर दिसणारा आनंद अत्यंत समाधान देणारा असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, ईटीसी केंद्र संचालक तथा उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, वाशी विभागाचे सहा.आयुक्त श्री.सागर मोरे व केंद्राच्या प्रमुख व विशेष शिक्षक आणि पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी आयुक्तांनी व उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तींना फराळ देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी सुसंवाद साधतांना आयुक्तांनी दिव्यांगांना मदतीचा हात देत सक्षम करण्याची जबाबदारी ही प्रशासन, विशेष शिक्षक व पालक अशी सर्वांचीच असल्याचे सांगत एकत्र येउुन अधिक चांगले कल्याणकारी काम जबाबदारीने करुया असे सांगितले. दिव्यांग मुलांचे पालक हे देखील विशेष शिक्षक असल्याचे नमूंद करीत आयुक्तांनी ईटीसी केंद्रात मुलांसमवेत येणा-या पालकांसाठीही विशेष उपक्रम राबवावेत असे निर्देर्शित केले. तंत्रज्ञानात झपाटयाने बदल होत असून दिव्यांगांसाठीच्या अद्ययावत उपचार पध्दतींचा समावेश ईटीसी केंद्रात करावा असेही आयुक्तांनी सूचित केले.

ईटीसी केंद्रातील विविध शैक्षणिक कक्षांना व वर्गांना भेट देत आयुक्तांनी तेथील विशेष शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला. यावेळी आयुक्तांनी दिव्यांग मुलांच्या कौशल्य विकासावर लहानपणापासूनच भर देण्याची सूचना करीत त्यादृष्टीने नियमित शिक्षणासोबतच विविध प्रकारचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचीही सुविधा उपलब्ध्‍ करुन देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश दिले.

यावेळी उपस्थित पालकांपैकी 10 पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना ईटीसी केंद्रामुळे त्यांच्या पाल्यांच्या जीवनात घडलेल्या आमुलाग्र बदलाबद्दल गौरवोद्गार काढले. अनेक पालकांना बोलताना आनंदाश्रू अनावर झाले. ईटीसी केंद्रातील वेगवेगळया उपचार पध्दतींचा मुलांच्या वर्तनावर होणारा सकारत्मक परिणाम पालकांनी अत्मियतेने सांगितला. आयुक्तांनी दिव्यांग मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याचा राबविलेला उपक्रम दिलासा देणारा असल्याचे पालकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *