Month: October 2024

 कथोरेंविरूद्ध निष्ठावंतांची आघाडी ?

 कपिल पाटलांच्या नेतृत्वात मेळावा, कथोरेंना अप्रत्यक्ष आव्हान देण्याची खेळी बदलापूरः मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना आता भाजपातून उघड आव्हान दिले जात असून मुरबाडमध्ये नुकताच निष्ठावंतांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात कपिल पाटील यांनी किसन कथोरेंना नाव न घेता भाजप सोडून अपक्ष लढा आणि ताकद दाखवा असे थेट आव्हान दिले. विशेष म्हणजे मुरबाड विधानसभा मतदारसंघातून एकेकाळी कथोरे यांच्या भाजप प्रवेशासाठी आघाडीवर असलेले पदाधिकारीही यात मंचावर बसून होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपात जुन्या जाणत्यांची वेगळी फळी उभारून कथोरेंना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची चर्चा आहे. दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये तत्कालिन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या शासकीय बंगल्यावर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी कथोरे यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मोठी फळी भाजपात आली. कथोरे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी तात्काळ स्विकारले. मात्र कालांतराने भाजपातील जुने पदाधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात आलेले पदाधिकारी असे दोन गट अनेकदा दिसून आले. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात उघड दुफळी दिसली. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पराभवानंतर मुरबाड विधानसभा मतदारसंघातही पाटील समर्थक आणि कथोरे समर्थक असे गट दिसले. पाटील यांनी कथोरे यांच्यावर वेळोवेळी हल्ले चढवले आहेत. त्यातच रविवारी मुरबाडमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वात निष्ठावंतांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम पातकर, संघ आणि भाजपचे निष्ठावंत समजले जाणारे शरद म्हात्रे, आण्णा कुलकर्णी यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. किसन कथोर विरूद्ध कपिल पाटील संघर्ष विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तीव्र होत असतानाच झालेल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी कथोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. लोकसभेला काही जणांनी पक्षविरोधी काम केले. आता केंद्र सरकारकडून मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय काही लोक घेत आहेत. त्यांना उत्तर दिले पाहिजे असे पाटील यावेळी म्हणाले. आधी काही लोक बोलायचे माझ्या मतदारसंघात काम शिल्लक राहिली नाहीत. मग आता कसली भूमीपूजन करत आहात, असा सवालही पाटील यांनी अप्रत्यक्षपणे कथोरे यांना विचारला. निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्याला भाजपची भूमिका मांडू न देणाऱ्यांना थांबवल पाहिजे. भाजपची ताकद बाजूला करून तुम्ही अपक्ष लढून दाखवा, असे थेट आव्हानच पाटील यांनी कथोरे यांना दिले. तसेच मतदारसंघात निष्ठावंतावर अन्याय होऊ देणार नाही, असे सांगत विधानसभेत कथोरे यांना पाटील यांनी इशाराच दिला दिला. या निष्ठावंतांच्या मेळाव्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कोट मेळाव्याच्या बॅनरवर असलेल्या निष्ठावंत शब्दामुळे मेळाव्याला गेलो. पक्षातील जुन्या, निष्ठावंतांना बाजूला सारण्यात आले आहे हे खरे आहे. ही कृतघ्नता आहे. आम्हाला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे भावना मांडण्यासाठी मेळाव्यात होतो. शरद म्हात्रे, जुने भाजप पदाधिकारी, बदलापूर. कोट अपक्ष लढण्याचा प्रश्नच येत नाही. मला पक्षच विधानसेभेचे तिकीट देत आहे तर मी का अपक्ष लढू. किसन कथोरे, आमदार, मुरबाड. 0000

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस संगणक भेट

रमेश औताडे मुंबई : शाळेतील जुन्या मित्रांना भेटणे व आपल्या शिक्षकांच्या व शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असतो. २२ वर्षांनी श्री निनाई देवी विद्यालय तुळसण च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक घेण्यासाठी आर्थिक मदत केल्याचे निनाईदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी सांगितले. या आनंदाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कल्याण कुलकर्णी, हणमंत शेवाळे, रघुनाथ पाटील, संभाजी खोचरे,  सदानंद शेवाळे, रमेश वीर काका,  हणमंत चव्हाण भाऊ उपस्थित होते. स्नेहमेळावा नियोजन वैशाली माने, वंदना पाटील, सिमा पोळ, उज्वला मोळावडे, स्वाती गुरव, स्वाती मोरे, बाबासो खोत, अमोल मोरे, अभिषेक वीर, हिम्मत वीर, भगवान वीर यांनी नियोजन केले तर विजय मोहिते यांनी सूत्रसंचालन व सीमा पोळ यांनी आभार मानले.

 टोल माफीवरून राजकीय श्रेयवादासाठी चढाओढ

lठाण्यातील टोलनाक्यावर मनसे, शिंदेसेना, भाजपचा जल्लोष ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांच्या टोल माफीचा निर्णय जाहीर करताच श्रेयवादावरून आता राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. या निमित्ताने ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्यावर मनसेने जल्लोष करीत पेढे वाटले. तर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्यामागोमाग भाजप कार्यकर्त्यांनीही टोलनाक्याकडे धाव घेतली. टोलनाक्यावर खोळंबा टोलमाफीचा निर्णय सोमवारी सकाळी जाहीर झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर वाहन चालकांना लाडू  आणि पेढे वाटले. मनसेचे पदाधिकारी तेथून निघाल्यावर शिंदे सेनेचे पदाधिकारी तेथे पोचले आणि त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली.  या श्रेयवादामुळे टोलनाक्यावर सोमवारी वाहनांचा अक्षरश: खोळंबा झाला. १२ वर्षे आमचा टोलमाफीसाठी संघर्ष सुरू होता. आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी अंगावर केसेस घेतल्या. टोलमाफी व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच सर्वप्रथम आवाज उठवला. कोणी आता काही बोलत असेल तरी खरे श्रेय राज ठाकरे यांचेच आहे. – रवी मोरे, शहराध्यक्ष, मनसे, ठाणे हे टोलनाके आघाडी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबई ठाण्यातील लोकांवर लादले. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष होता. २००९ साली मी पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार झालो. मी आणि शिंदे हे विरोधी पक्षाचे सदस्य असताना आम्ही आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन केले होते. पाच वर्षांपूर्वी जे वचन दिले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करून दाखविले आहे. -प्रताप सरनाईक, आमदार, शिंदेसेना     नऊ वर्षांपूर्वी मी याच आनंदनगर टोलनाक्यावर टोलमाफीसाठी आंदोलन केले होते. सत्ताधारी पक्षात असो वा विरोधी पक्षात असो, सातत्याने टोलमुक्ती करा आणि मुंबई एन्ट्री पॉइंटला टोल लावू नका, अशी वारंवार मागणी केली. आंदोलन आणि उपोषण केले. आज खऱ्या अर्थाने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला. – संजय केळकर, आमदार, भाजप

बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार

 कोअर कमिटीत निर्णय नालासोपारा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजणार असल्याने लक्षात घेऊन मंगळवारी बहुजन विकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक विरार येथे पार पडली. या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सहा जागांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील सहाच्या सहा जागा लढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्याचसोबत या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी वसईमधून निवडणूक लढवावी असा आग्रह कोअर कमिटीतील पदाधिकारी यांनी केला आहे. सर्वच पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरू केली असून पालघर जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मंगळवारी पालघर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पालघर जिल्ह्यातील सहा जागाचा आढावा घेण्यात आला. बहुजन विकास आघाडी जिल्ह्यातील सहाच्या सहा जागा स्वबळावर लढणार असल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेश पाटील, जेष्ठ नेते मुकेश सावे , माजी उपमहापौर उमेश नाईक, माजी महापौर रुपेश जाधव, अजय खोकाणी, जितूभाई शहा, माजी खासदार बळीराम जाधव, माजी सभापती प्रफुल साने, पंकज ठाकूर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नारायण मानकर यांनी सांगितले की, ही पहिली सभा पालघर जिल्ह्यासाठी झाली असून या पुढील बैठका राज्यातील कोकण, सोलापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे मुंबई, मराठवाडा आदी भागांतील कोअर कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्तेशी बोलून होणार आहे. दरम्यान, बविआ राज्यात जवळपास ५० विधानसभेच्या जागा लढणार आहे. यावेळी पत्रकारांनी बविआचे जेष्ठ नेते व कार्याध्यक्ष राजीव पाटील यांच्या भाजप प्रवेशा बाबतीतला प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी स्पष्ट केले की, याबाबत अद्याप पक्षापर्यंत कुठलीही अधिकृतपणे माहिती आलेली नाही. त्यामुळे जर तरच्या गोष्टीवर उत्तर देणे सयुक्तिक ठरणार नाही त्यानिमित्ताने या विषयावर अधिक चर्चा झाली नाही.  

जिल्ह्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्र; आयुष्मान आरोग्य मंदिर

उपकेंद्र स्तरावर १८ संस्थांना  कायाकल्प पुरस्कार –  रोहन घुगे ठाणे :केंद्र व राज्यशासनाच्या वतीने रुग्णांना शासकीय रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने कायाकल्प पुरस्कार रुग्णालयांना देण्यात येतो. यावर्षी कायाकल्प पुरस्कारांची घोषणा राज्यस्तरावरून करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र  स्तरावर ९ संस्थाना व आयुष्मान आरोग्य मंदिर – उपकेंद्र स्तरावर १८ संस्थांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानिमित्ताने जिल्हा परिषद येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र प्रमुख यांचा  सन्मान करण्यात आला. कायाकल्प परितोषिक मिळवण्यामध्ये सर्व संस्थांचे सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ,  प्रशासकीय विभाग व विशेषतः सर्व सफाई कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांचे विशेष अभिनंदन आणि ठाणे जिल्ह्यातील इतर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना विविध पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रेरणास्थान म्हणून पुढील कामकाज करावे असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.स) डॉ. मृणाली राहुड, सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कायाकल्प पुरस्कार सुरू करण्यात आला असून आरोग्य सेवेतील गुणवत्ता व सोयी सुविधा उत्तम करणे हे या योजनेचे उदिष्ट आहे. बाह्य परिसर स्वच्छता व सुशोभिकरण, जैविक घन कचरा व्यवस्थापन, सांड पाणी व्यवस्थापन, आंतरिक स्वच्छता, निर्जंतुकीकरण, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच रुग्णांचे अभिप्राय याबाबींवर मुल्यांकन गुण कायाकल्प अंतर्गत ठरविण्यात येतात. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रा .आ केंद्र खारबाव  यांनी रक्कम रुपये २ लक्ष पारितोषिक व आयुष्मान आरोग्य मंदिर – उपकेंद्र स्तरावर उपकेंद्र लाप  ता .भिवंडी  यांनी रक्कम रुपये १ लक्ष पारितोषिक घेऊन  जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी ,धसई, शेणवा ,कसारा ,दाभाड ,शिरोशी ,खडवली ,बदलापूर यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रु.  पारितोषिक प्राप्त झाले आहे. उपकेंद्र स्तरावरील उपकेंद्र सापगाव ता. शहापूर प्रथम उपविजेता ५० हजार रु, उपकेंद्र फळेगाव ता.कल्याण दुसरे उपविजेता  ३५ हजार रु पारितोषिक घेऊन  यशस्वी झाले आहेत.  उपकेंद्र भिसोल, ओजीवले, कान्होर, दापोडे, वडूनवघर, पहारे, नडगाव, मानिवली, साने, खांबाला, बोहोनोली, भिणार, कालवर, उसगाव, आमने या उपकेंद्रांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त झाले आहे.

 कल्याणमधील चिकणघर येथील मालमत्ता कर थकविणारा पेट्रोल पंप सील

मालमत्ता कर विभागाची कारवाई कल्याण : नियमित नोटिसा बजावुनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील रोशन पेट्रोल पंप मालकाचा पेट्रोल पंप कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे अधिकारी आणि ब प्रभागाचे साहाय्यक आयुक्त, अधीक्षक यांनी मंगळवारी सील केला. रोशन पेट्रोल पंप मालकाकडे मालमत्ता कराची पालिकेची ९५ लाख १४ हजार रूपयांची थकबाकी आहे. रोशन पेट्रोल पंप हा कल्याण पश्चिमेतील चिकणघर भागातील महत्वाचा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपवर सीलबंद करण्याची कारवाई केली तर त्याचा त्रास वाहन चालकांना होईल. या सहानुभूती विचारातून पालिकेने या थकबाकीदार पेट्रोल पंप चालकाला थकित कर भरणा करण्यासाठी मुभा दिली होती. अलीकडेच रोशन पेट्रोल पंप मालकाला थकित कर भरण्यासाठी ब प्रभागाच्या कर विभागातून नोटीस बजावण्यात आली होती. या रकमेचा टप्प्याने भरणा करावा, असेही प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांनी केले. त्यालाही पंप मालकाने दाद दिली नाही. अखेर मंगळवारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून ब प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, मालमत्ता कर विभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे, कर अधीक्षक प्रमोद पाटील यांनी चिकणघर येथे जाऊन रोशन पेट्रोल पंप सील करण्याची कारवाई केली. जोपर्यंत मालमत्ता कराची थकित रक्कम पंंप मालकाकडून पालिकेत भरणा केली जात नाही तोपर्यंत सील न काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे पालिकेची मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यांनी तातडीने आपली चालू, थकित रक्कम पालिकेत भरणा करावी आणि पालिकेकडून होत असलेली कटू कारवाई टाळावी, असे आवाहन मालमत्ता कर विभागाने केले आहे.

 महाराष्ट्र राज्य होमगार्ड्ची दिवाळी गोड

दुपटीने वाढ, प्रतिदिन १०८३ रुपये कर्तव्यभत्ता लागू हरिभाऊ लाखे नाशिक : महाराष्ट्र राज्यातील गृहरक्षक दलाच्या स्वयंसेवकांच्या प्रलंबित विनंतीला मंजुरी देत मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार होमगार्डला आता प्रतिदिन १ हजार ८३ रुपये कर्तव्यभत्ता लागू झाला आहे. तर, सर्व भत्ते मिळून होमगार्डला प्रतिदिन अठराशे रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये होमगार्डच्या मानधनवाढीचाही समावेश आहे. महाराष्ट्रात ६ डिसेंबर १९४६ रोजी स्थापन झालेल्या गृहरक्षक दलाच्या स्वयंसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२४ पासून सुधारित भत्ता लागू झाल्याने नवरात्र उत्सवात पोलिसांसमवेत कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्डला त्याचा लाभ होणार आहे. यासह दिवाळी व आगामी विधानसभा निवडणुकीतील बंदोबस्तातही सुधारित भत्त्यानुसार होमगार्डला मानधन दिले जाईल. तर, राज्यात गत महिन्यात ११ हजार २०७ गृहरक्षकांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने नवीन होमगार्डसाठी ही शुभवार्ता ठरली आहे. त्यानुसार, नाशिक शहरात १६१, इगतपुरीत चाळीस, सिन्नरमध्ये पन्नास आणि निफाडमध्ये तीस होमगार्डची निवड करण्यात आली. सध्या नाशिक जिल्ह्यात दीड हजारांपेक्षा जास्त होमगार्ड कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, होमगार्डला नियमित कर्तव्यावर बोलावण्यात येत नाही. महत्त्वाचा बंदोबस्त, सणोत्सव आणि निवडणुकीत होमगार्डला कर्तव्यावर नेमण्यात येते. यासह पोलिस ठाण्यांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेकदा नाकाबंदी व इतर बंदोबस्तासाठी बोलावण्यात येते. त्यामुळे पोलिस भरतीसह इतर यंत्रणांत भरतीच्या प्रतीक्षेत असणारे उमेदवार सध्या होमगार्डचे कर्तव्य पार पाडत आहेत. या सर्वांसाठी प्रतिदिन अठराशे रुपयांचे मानधन महत्त्वपूर्ण व उमेद वाढविणारे ठरणार आहे. सन २०२४-२५ साठी ५५२ कोटी अतिरिक्त रक्कम मंजूर सन २०२५ पासून दरवर्षी ७९५ कोटींची तरतूद करण्यास मान्यता सन २००८ पासून १५० रुपये प्रतिदिन भत्ता; तत्पूर्वी ७५ रुपये प्रतिदिन सन २०१४ पासून ३०० रुपये प्रतिदिन भत्ता; सध्या ५७० रुपये प्रतिदिन होमगार्ड भत्ता सध्याचे दर सुधारित दर कर्तव्य ५७० रुपये प्रतिदिन १,०८३ रुपये प्रतिदिन उपहार १०० रुपये २०० रुपये कवायत ९० रुपये १८० रुपये खिसा ३५ रुपये १०० रुपये भोजन १०० रुपये २५० रुपये

 उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारामुळे घाटाला अहिल्यादेवींचे नाव ठाणे : ठाण्यातील उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यात आले असून याच लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलावालगत घाटाची निर्मिती करण्यात आली होती या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली होती. प्रतिष्ठानने केलेली मागणी मान्य करत आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट असे नाव दिले आहे असून या घाटाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. तर जागेवर धनगर समाज बांधवांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रताप सरनाईक धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचे अध्यक्ष माधवी बारगीर, यशवंत सेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजीत कोकरे, समाजसेवक अभिजीत चोरामले, शिक्षक सेनेच्या महिला अध्यक्ष शोभा गरांडे,भाजपा भटक्या विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा  वर्षा माने, भाजपा वार्ड अध्यक्ष संदीप माने, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार धायगुडे, उपाध्यक्ष बाळा विरकर,खजिनदार अनिल जरग, कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर, सुरेश भांड, संतोष बुधे, दीपक झाडे,उद्धव गावडे, उत्तम यमगर, नामदेव चांगण,अनिकेत पाडसे, मनोज खाटेकर वैभव सामसे,सुनील पळसे, महिला मंडळ सचिव गायत्री गुंड, सुषमा बुधे,सुजाता भांड,सीमा कुरकुंडे, तृप्ती पाडसे,आदिसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नदीवर घाट बांधण्याची मूळ संकल्पना ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आहे. संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी त्यांनी घाट उभारले आहेत. त्यामुळे या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी धनगर प्रतिष्ठानने केली होती अखेर त्यांच्या या मागणीला यश आले असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट असे नाव देण्यात आले आहे. यामुळे धनगर प्रतिष्ठानने आमदार प्रताप सरनाईक यांचा सत्कार करून त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.तसेच या नावाच्या निर्मितीसाठी परिश्रम घेणारे ठेकेदार सत्या लांडगे यांचे देखील प्रतिष्ठाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

माथेरान मधील मुख्य रस्त्यांची बत्ती गुल

माथेरान : पर्यटन नगरी माथेरान मधील मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून बत्तीगुल असल्याने पर्यटकांना आणि नागरिकांना अंधारातून चाचपडत मार्गक्रमण करावे लागत आहे. संबंधीत ठेकेदार याबाबत काहीही ठोस उपाययोजना करत नसून केवळ आपली कामांची बिले वसुलीसाठी केव्हातरी येऊन हजेरी लावत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. त्याचप्रमाणे गावातील गल्लीबोळात सुध्दा हीच परिस्थिती असल्याने काळोखातून अपंग व्यक्तींना पायी चालत जाणे खूपच त्रासदायक बनलेले आहे. अनेकदा याबाबत सोशल मीडियावर काहींनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याकडे संबंधित खात्याने दुर्लक्षच केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माथेरान हे पर्यटनस्थळ असल्यामुळे रात्री अपरात्री केव्हाही पर्यटक येत असतात. दस्तुरी पासून गावांपर्यंत क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते असल्याने चालत येणे सोयीचे ठरते. परंतु या मुख्य रस्त्यावर नेहमीच बत्ती गुल असते. काही दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठ येथील मुन्ना पानवाले यांच्या दुकानात चोरीची घटना घडली होती. असे प्रकार आगामी काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रहदारीच्या रस्त्यावर सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या वेळी खरेदी करणे कठीण होते. त्यामुळे काहीही खरेदी न करता ते आपल्या हॉटेलमध्ये जातात याचा परिणाम इथल्या व्यापारी वर्गावर, लहानमोठ्या स्टोल्स धारकांवर होत असतो. याकामी संबंधित खात्याने या समस्या मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर कामे करावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रोटरीचा दिव्यांगांना मदतीचा हाथ 

  ठाणे : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या वतीने रोटरी दिव्यांग सेंटर कल्याण संचालित ऑटोसच्या सहकार्याने दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तींचे एक शिबिर रविवारी ठाण्यात संपन्न झाले. त्यात दिव्यांगांच्या पायाचे मोजमाप घेण्यात आले. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण अध्यक्ष बिजू उन्निथन, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ अध्यक्ष मेधा जोशी, सचिव रमेश मोरे, सचिव अमोल नाले, प्रकल्प प्रमुख प्रफुल  क्षिरसागर, प्रकल्प प्रमुख देवयानी वेद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. रोटरी क्लब सामाजिक भावनेतून गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवित आहे. नौपाडा येथील सरस्वती शाळेच्या आवारात हे शिबिर संपन्न झाले. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतून  52 दिव्यांगांनी नोंदणी केली होती. 40 दिव्यांग या शिबिरास उपस्थित होते. तज्ञ व्यक्तिंनी या दिव्यांगांच्या पायाचे मोजमाप घेतले. सरस्वती विद्यालयात 27 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे वाटप करण्यात येणार आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी शिबिराला उपस्थिती लावत रोटरीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.