Month: October 2024

काम रस्ते सफाईचे, निविदेत अटी मात्र घंटागाडीच्या!

नाशिक महापालिकेत अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार हरिभाऊ लाखे  नाशिक : विधानसभा निवडणुका दृष्टीक्षेपात असताना नाशिक महापालिकेचा अजब कारभार आता समोर आला आहे. महापालिकेचे रस्ते सफाईचे काम असताना निविदेत मात्र घनकचरा संकलनाशी…

षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त सुनिता चव्हाण यांच्या क्रीडा कार्याचा झाला गौरव

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप तर्फे आतापर्यंत यशस्वीपणे साकारलेल्या ९९ बुध्दिबळ स्पर्धा, ४१ कबड्डी स्पर्धा, ८६ क्रिकेट स्पर्धा, ६५ कॅरम स्पर्धा, २२ शरीरसौष्ठव स्पर्धा, २१ व्यायाम स्पर्धा, ७ खोखो स्पर्धा, ४१ क्रीडा प्रशिक्षण शिबीर आदी उपक्रमामध्ये क्रीडाप्रेमींचा मोलाचा वाटा होता. त्यामध्ये उपक्रमा अनुषंगाने बॅकस्टेज सांभाळणाऱ्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या महिला क्रीडा विभाग प्रमुख सुनिता चव्हाण यांच्या कार्याचा सहभाग देखील महत्वाचा होता. म्हणूनच आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सुनिता चव्हाण यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीचे औचित्य साधून नुकताच माजी नगरपाल व लायन्स डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सुवर्ण गौरवचिन्ह प्रदान करून क्रीडा कार्याचा सन्मान करण्यात आला. नुकतीच पार पडलेली राज्य स्तरावरील शालेय ६० मुलींची मोफत कॅरम स्पर्धा ही सुनिता चव्हाण यांच्या क्रीडा कार्याची पोचपावती ठरली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मागील तीन महिन्यात झालेल्या पाचपैकी  तीन शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेत काही तांत्रिक अडचणींमुळे फक्त मुलांची स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे स्पर्धांपासून वंचित झालेल्या ३१ मुलींनी स्पर्धेसाठी जोरदार मागणी केली. परिणामी कार्यालयीन कॅरम स्पर्धेत उल्लेखनीय खेळ करणाऱ्या महिला क्रीडा विभाग प्रमुख सुनिता चव्हाण यांनी स्वतःच्या आईच्या स्मरणार्थ आयडियलमार्फत फक्त मुलींसाठी क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई कडवे स्मृती विनाशुल्क कॅरम स्पर्धा आयोजित केली. त्यांच्या सक्रीय मार्गदर्शनामुळे आरएमएमएस सहकार्यीत राष्ट्रीय स्तर गाजविणाऱ्या राज्यातील सबज्युनियर कॅरमपटूसह शालेय ६० मुलींच्या सहभागाने यशस्वी झालेली आंतर शालेय मुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा रंगली. परेल येथील स्पर्धेमध्ये सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल-पुण्याच्या तनया पाटीलने अंतिम विजेतेपद तर आर.बी. शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा कदमने अंतिम उपविजेतेपद पटकाविले. पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कारासह गौरविण्यात आले. केवळ मुलींसाठी चँम्पियन कॅरम सेटवर मोफत स्पर्धा आयोजित केल्याबद्दल राज्यातील पालक-शिक्षक वर्ग, खेळाडू यांनी सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक करीत मुलींच्या स्पर्धेचे सातत्य राखण्याचे आवाहन केले.

मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटलचे लोकार्पण

अनिल ठाणेकर ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटलचे उदघाटन शुक्रवारी पार पडले. सर्व वैद्यकीय उपचार व मोठ्या सर्जरी सरकारी योजनेतून मोफत केल्या जाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा-भाईंदरच्या धर्तीवर घोडबंदर येथील नळपाडा येथे १५० बेडचे सुपर स्पेशालिटी “मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक” या नावाने कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी खासदार नरेश मस्के, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मा. नगरसेविका परिषा सरनाईक, आशा डोंगरे, विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभागप्रमुख भगवान देवकाते, युवासेनेचे सिद्धार्थ पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कॅशलेस रुग्णालयाचा फायदाओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना घेता येणार आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची ज्यांना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आले असून सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे. लाखो रुपये ज्या ऑपरेशन साठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होण्यास आता सुरुवात होणार आहे. गरजूंना औषधेही मोफत देणार आहेत. २४ तास हॉस्पिटल गरजूना सेवा देणार आहे.  हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने पेशंटच्या साध्या तपासणी पासून, विविध टेस्ट करणे आणि डॉक्टरांचे कन्सल्टिंग, पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू न दिल्याने हे हॉस्पिटल आजपासून लोकांच्या सेवेत दाखल होणार असून हे हॉस्पिटल म्हणजे गरीब – गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. घोडबंदर रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत महापालिकेच्या माध्यमातून बनविण्यात आलेली असून या इमारतीत ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी  कॅशलेस हॉस्पिटल सुरू करावे यासाठी आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न केले. महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून होणारी वैद्यकीय मदत दिड लाखापासून पाच लाखापर्यंत नेण्यात आल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, तसेच घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले.ठाणे शहरातील हे हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे शहरातील दुसरे तर महाराष्ट्र राज्यातील तिसरे सरकारी कॅशलेस हॉस्पिटल आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हे कॅशलेस हॉस्पिटल चालणार आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व उपचार, कार्डिओलॉजी, अँजिओप्लास्टी, बायपास हृदय शस्त्रक्रिया, ब्लॉक बदलणे, पेसमेकर बसविणे अशा मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार त्याचप्रमाणे इस्पितळात रक्त तपासणी, हेमेटोलॉजी, बायोकॅमिस्ट्री चाचणी, ईसीजी, सोनोग्राफी, 2डी इको, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, कॅट्सकॅन, सीटी स्कॅन स्क्रिनिंग, यूरो शस्त्रक्रिया, न्यूरो सर्जरी जसे की कॅनिओटॉमी, हेमॅटोमा इव्हॅक्युएशन, स्पाइन सर्जरी, लॅमिनेक्टॉमी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया जसे की हिस्टेरेक्टॉमी, डोके आणि मानेचा कर्करोग, स्त्रीरोग कर्करोग, पोटाचा कर्करोग इ. सारख्या ऑन्को शस्त्रक्रिया येथे होणार असून या सुविधा विनामूल्य (कॅशलेस) स्वरूपात पिवळ्या, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिका धारकांसाठी येथे सरकारी योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहे.

हरित लवादाने १०२ कोटींचा व उच्च न्यायालयाने विकासक आणि ठामपाला दोन लाखांचा दंड ठोठावला!

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांवर कारवाई करावी – नितीन देशपांडे अनिल ठाणेकर ठाणे : महापालिका स्थापन झालेल्या ४३ वर्षाच्या पदार्पणादिवशीच पुणे हरित लवादाने, ठाणे महापालिकेच्या ठाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाला १०२.४ कोटीची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणीय हानीसाठी ही दंडाची रक्कम ठाणे महापालिकेला भरावी लागणार आहे. देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात, प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यातबद्दल ठामपास हा दंड ठोठावला आहे. त्यानंतर केवळ आठ दिवसांनी ठाण्याचा प्रसिद्ध कोरम माॅलचे नाल्याच्या जागेवर बांधकाम नियमित करण्याचा २००५ सालचा तत्कालीन ठामपा आयुक्तांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द करून विकासक आणि ठाणे महापालिकेला दोन लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे. ठामपाने नाल्यावर बांधलेले बांधकाम थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर आदेश झुगारून बेकायदेशीरपणे माॅलचे बांधकाम चालूच ठेवले. काही भाग पाडल्यानंतर ही तेथे नव्याने बांधकाम करण्यात आले.अशी परिस्थिती असताना फेब्रुवारी २००५ आयुक्तांनी विशेषाधिकार वापरून बांधकाम नियमित केले. सार्वजनिक सुविधांशी तडजोड करून खाजगी विकासाचा फायद्यासाठी अधिकार वापरले, हा हेतू फारच भयानक आहे.मात्र, कायद्याने महापालिका आयुक्तांना विशेषाधिकार देण्यात आले असले, तरी महापालिका आणि तिच्या आयुक्तांना त्यांच्याकडील या विशेषाधिकाराचे मालमत्तेचे विश्वस्त या नात्याने केवळ महापालिकेच्या आणि जनतेच्या हितासाठी वापर करणे बंधनकारक आहे. असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. मात्र याबद्दल आपण काहीही कार्यवाही केलेली नाही, आपले सरकार इतके असंवेदनशील आहे का ? ठामपाच्या बेकायदेशीर कृतीमुळे प्रामाणिक करदात्यांवर भुर्दंड का ? कायदे नियम वगैरे जनतेचा सुरक्षिततेसाठी केले आहेत याची विश्वस्त म्हणून आयुक्तांना माहिती असूनही सदर बाब कायदेशीर कसूरीची सर्वोच्च कळस पार करणारी आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री असलात तरी ठामपाचे करदाते प्रथम आहात. दंड भरण्याची रक्कम प्रमाणित करदात्यांच्या करातून जाणार आहे. यासाठी वरील बाबतीत आपण कठोर पावले उचलून ठामपा व कायदेशीर कर्तव्यात कसूरी करण्यावर तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा राज्याची प्रतिमा जनतेसाठी नव्हे तर बेकायदेशीर बाबींचे सरंक्षण करणारी उभी राहील आणि याला आपली मान्यता आहे असे समजले जाईल. ठामपाच्या वरील बेकायदेशीर बाबींवर उघड्यावर आल्यामुळे ठामपाच्या गेल्या दोन दशकातील अश्या अनेक बाबींची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे.

अन् मातेसह वाचले नवजात अर्भकाचे प्राण

मर्जिया पठाण यांनी दिला मानवतेचा धडा ठाणे : आज माणसे एवढी निग्गरगट् झाली आहेत की शेजारील माणूस वेदनेने तळमळत असतानाही ढुंकूनही पहात नाहीत  मात्र  मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांनी रस्त्यावर वेदनेने तळमळणाऱ्या गर्भवतीला ओळखपाळख नसतानाही उचलून रूग्णालयात दाखल केले अन् तिचे बाळंतपण केले. मर्जिया यांच्या या मानवतावादी दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतूक होत आहे. मुंब्रा येथे राहणारी रोशनी काळे ही गर्भवती महिला मित्तल रोड परिसरात काही कामानिमित्त आली होती. मात्र अचानक तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. प्रचंड वेदना होऊ लागल्याने रोशनी रस्त्यावर पडली मात्र आजूबाजूला कोणीही मदतीसाठी धाऊन गेले नाही. त्याचवेळेस आपल्या अमृतनगर येथील कार्यालयात बसलेल्या मर्जिया शानू पठाण यांना ही माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मित्तल रोड गाठले. तिथे पोहचताच मर्जिया पठाण यांनी आधी रोशनी यांना धीर दिला. स्वतः गाडीमध्ये उचलून बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र वेदनेमुळे रोशनी हिस गाडीत बसणे अशक्य होत असल्याने एक रिक्षा थांबवून त्यातून रोशनी हिला कौसा रूग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांना पाचारण करून रोशनी हिचे बाळंतपण केले. रोशनी हिला पुत्ररत्नाचा लाभ झाला असून मुलीचे वडील कस्तूर यांच्या विनंतीवरून मर्जिया यांनी मुलाचे शिवा असे नामकरण केले आहे. दरम्यान, डोक्यावर सूर्य आग ओकत असल्याने आणखी उशीर झाला असता तर गर्भवती महिला आणि तिच्या बाळाच्या जीवावर बेतले असते. मात्र, मर्जिया पठाण यांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळेच रोशनी आणि तिच्या मुलाचे प्राण वाचले असे डाॅक्टरांनी सांगितले.  

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कॅन्सरग्रस्तांना अन्नदान वाटप

मुंबई, : –  मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण मध्य-मुंबई जिल्हाध्यक्ष समाजरत्न डॉ. सिद्धार्थदादा टी.कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त चांदिवली तालुकाध्यक्ष सुरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली टाटा कॅन्सर हॉस्पिटलजवळ अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. याशिवाय कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला, यावेळी चांदिवली राष्ट्रवादी परिवाराचे प्रशांत बारामती (जिल्हाप्रमुख सामाजिक विभाग), अस्लम शेख जिल्हा सचिव, संतोष गवळी (162 प्रभाग अध्यक्ष) डॉ. ) सचिन वाकोडे (तालुका अध्यक्ष सामाजिक), आलोक राय युवक समाजसेवक आणि आनंद मार्ग युनिव्हर्सल रिलीफ टीम च्या दीदी सहित मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. 00000

सरकारच्या विरोधात

 महाविकास आघाडीचा पंचनामा मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असतानाच महाविकास आघाडीकडून महायुती सरकार विरोधात गद्दारांचा पंचनामा करणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.  महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (श प) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया धुळे, संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर घणाघाती प्रहार केला. पटोले म्हणाले की, गद्दारांचा पंचनामा आम्ही केला आहे. अडीच वर्षात यांनी कसं सरकार चालवलं याचा पंचनामा यात करण्यात आला आहे. ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तेचं लोक आज सत्तेत आहेत. त्याच लोकांच्या भ्रष्टाचारामुळे छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही या घटनेची माफी मागितली नाही. काल तर बाबा सिद्धकी यांची हत्या करण्यात आली. सत्ता पक्षातील नेते देखील सुरक्षित नाहीत. स्वतःच राजकारण कसं करायचं हेच यांच्या डोक्यात आहे.असे पटोले म्हणाले. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की हत्या प्रकरणाची अद्याप योग्य माहिती आमच्याकडे आलेली नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे तपासावर परिणाम होईल, असं काही बोलणार नसल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील जनता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभेच्या निकाल काहींनी मान्य केला नाही, तेव्हा लोकांनी बदल हवा आहे हे सांगितलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारांचा पंचनाम आम्ही केला आहे. महाराष्ट्राबरोबर यांनी गद्दारी केली आहे. येत्या दीड महिन्यात हे सरकार घालवायला हवं. मुंबई हे असं शहर आहे तिथं २ पोलिस कमिशनर आहेत. जे जे लाडके आहेत त्यांना कमिशनर करा. पाच कमिशनर करा. माझं स्पष्ट म्हणणं आहे की, जी गद्दाराना सुरक्षा देण्यात आली आहे. ती काढा आणि लोकांसाठी वापरा. ही जबाबदारी गृहमंत्री यांची आहे. मोठं मोठे सध्या होर्डिंग लावतात. देवेंद्रजी म्हणतात उद्या गाडी खाली कुत्र आल तरी म्हणाल गृहमंत्री जबाबदार आहे. आता यावर त्यांचं काय उत्तर आहे. सध्या केवळ कलाकार सोबत घेऊन मोठ्या जाहिराती सरकार करत आहे असे ठाकरे म्हणाले.

 महायुतीच्या माध्यमातून शहापूरची विकसित शहराकडे वाटचाल

  माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे प्रतिपादन शहापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून शहापूर शहराची विकसित शहराकडे वाटचाल सुरू आहे. शहापूरात नागरी सुविधांसाठी विविध कामे सुरू असून, भविष्यात एक सुनियोजित शहर म्हणून शहापूरचा नावलौकिक होईल, असा विश्वास माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केला. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेतून शहापूरमध्ये सुमारे साडेआठ कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ७ मधील जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र, प्रभाग क्र. ११ मधील नगरपंचायत कार्यालयासमोर उद्यान, तहसील व पोलिस ठाण्याच्या आवारात हायमास्ट व स्वच्छतागृह, सोनार आळी येथे कॉंक्रिट रस्ता, भेंडी आळी येथे कॉंक्रिट रस्ता, प्रभाग क्र. १४ मधील डोंबिवली नागरी बॅंकेनजीक ओपन स्पेस वॉल कंपाऊंड बांधणे, जुना आग्रा रोड केणे आळी ते भारंगी नदीपर्यंत गटारांचे कॉंक्रिटीकरण, हायमास्ट बसविणे आदी कामांचे कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे शहापूर विधानसभा प्रमुख अशोक इरनक, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत, भाजपाचे तालुकाध्यक्ष विवेक नार्वेकर, नगरसेविका मिताली भोपतराव, योगेश महाजन, विनोद कदम, कामिनी सावंत, माजी नगरसेविका वैदेही नार्वेकर आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहापूर येथील पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभासाठी गायकवाड कुटुंबांने दानपत्रान्वये नगरपंचायतीला जमीन दिल्याबद्दल गायकवाड कुटुंबियांचे कपिल पाटील यांनी आभार मानले. तसेच या जलकुंभामुळे शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, याबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शहापूरच्या विकासासाठी आणखी भरीव निधी मिळेल, असा विश्वासही कपिल पाटील यांनी व्यक्त केला. 0000

‘जिथे नाही सन्मान तिथे  करणार नाही मतदान’

रमेश औताडे मुंबई : लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मतदानाचे परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे. मात्र जिथे मतदारांचा सन्मान होत नाही तिथे आम्ही मतदानच करणार नाही असा इशारा आंबेडकर रिपब्लिकन मोर्चा चे  राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिला. नागपूर येथे धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित मतदार परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. मतदारांनी आपल्या मतांचा अधिकार जर, जात, धर्म, परंपरागत  पक्ष,घराणेशाही यात अडकवून ठेवला तर लोकशाहीला ते घातक ठरते असे बागडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिक बांगर, प्रमुख पाहुणे रेखा राणगावकर होत्या. देवेंद्र बागडे, उद्धव तायडे, पौर्णिमा पाईकराव, डॉ सुधा जनबंधू, विकास काटे, नामदेवराव निकोसे, न्यायाधीश सुरेश घाटे, उत्कर्षा थुल, सुनिता गायकवाड,  दिलिप कदम, इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुरातत्व अधिक्षक नामदेवराव निकोसे यांनी नागपूर जिल्ह्याच्या वतीने संघर्ष निधी म्हणून पांच लाख एकावन्न हजार रुपये देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेची बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यावेळी अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे असे नारायण बागडे यांनी सांगितले. वैशाली तभाने यांनी मान्यवरांचे स्वागत, सूत्रसंचालन प्रा.रमेश, आभार प्रदर्शन मामासाहेब मेश्राम यांनी केले.

आईच्या कुशीतून अपहरण झालेला ‘दादा’ सापडला..!

त्रिकूटाला अटक ठाणे: आईच्या कुशीत झोपी गेलेल्या पाच महिन्यांच्या ‘दादा’चे अपहरण करणाऱ्या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांनी अटक करत, बाळाची सुखरूप सुटका केली, ठाणेनगर पोलिसांनी जेमतेम चार तासात गुन्हा उघडकीस आणला, अटक केलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश असून, यातील जावेद अजमत अली न्हावी याच्याविरोधात ठाणेनगर, राबोडी आणि कळवा या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली अपहृत बाळाला ताब्यात दिल्यावर मातेचे डोळे पाणावले राबोडी परिसरातील आवेद अजमत अली न्हावी (३५), सुरेखा राजेश खंडागळे (३४) आणि क्रिक नाका येथील जयश्री याकूब नाईक (४५) असे अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाने नात आहे. ठाण्यातील जेल तलावजवळील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या वनिता पवार (३५) या शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे पाच महिन्यांच्या ‘दादा’ला कुशीत घेऊन झोपी गेल्या, थोड्या वेळानंतर त्यांना आग आली तर कुशीत बाळ नसल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट ठाणेनगर पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, ठाणेनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पथक स्थापन करून त्या बाळाला शोधण्यास सुरुवात झाली. आई गहिवरली… पोलिस तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी निद्धी हॉलच्या समोरील ब्रिजच्या खाली बाळाला घेऊन गेले व त्याची आई वनिता पवार हिच्या हातात सुखरूप सोपवले, बाळाला पाहून ती गहिवरली. पोलिसांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळली. पोलिसांना काहीतरी बक्षीरा। द्यावं या भावनेनी तिने दमलेल्या पोलिसांसाठी कोल्डिंक्स तरी मागवा, असे पती राकेश यांना सांगितले. नौपाडा विभागाच्या सहायक आयुक्त प्रिया ढाकणे यांनी कोल्ड्रिंक्सला नम्रपणे नकार देत ‘बाळाला जपा’, असा सल्ला दिला. अवघ्या चार तासांत गुन्हा उघडकीस • सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बाळाला नेणाऱ्यांची माहिती कळल्यावर पोलिसांनी त्यांना अटक करत बाळाची सुटका केली. अवघ्या चार तासांत गुन्हा उघडकीस आणला. हे त्रिकूट बाळाचे अपहरण करून ते कोणाला विकणार होते का? यापूर्वी त्यांच्या अशाप्रकारे गुन्हे केले आहेत का? यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का? त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले, ठाणेनगर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक खेडकर, हेडकॉन्स्टेबल विक्रम शिंदे, गांगुर्डे, पो. हवालदार तानाजी अंबुरे, सागर पाटील, प्रकाश जाधव, पंकज दाभाडे, संदीप चव्हाण यांनी कामगिरी केली. पोलिस उपनिरीक्षक भारत मास्कड तपास करत आहेत.