डॉ..जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना दिले प्रति आव्हान

अनिल ठाणेकर

ठाणे : देवेंद्र फडणवीस यांना कदाचित कुणी सांगितले नसेल पण जिथून मुंब्र्याचा रस्ता सुरू होतो. तिथेच राजमाता जिजाऊ,  संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले , राजर्षी शाहू महाराज ,  डॉ.. बाबासाहेब आंबेडकर,  सावित्रीमाई फुले यांचे मोठे चित्रशिल्प आणि महाराष्ट्राचा नकाशा आपण उभारला आहे. आता निवडणुकीत भाषणे ठोकून मुंब्र्याला बदनाम केले जात आहे. फडणवीस यांनी  मला पुतळा द्या; सरकारची परवानगी द्या, मी तुम्हाला मुंब्र्यात पुतळा उभारून दाखवतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा मुंब्रा- कळवा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ..जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे आव्हान दिले होते. त्यावर डॉ..जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना प्रतिआव्हान दिले.

डॉ.. आव्हाड म्हणाले, मुसलमानांना कायम वाईट नजरेतून पहायचे, ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत औरंगजेबाच्या दरबारात गेलेला मदारी मेहतर हादेखील मुसलमानच होता. तेव्हा , उद्धव ठाकरे यांना जे आव्हान दिले आहे ते आपण स्वीकारतो. तुम्ही मला पुतळा आणि सरकारी परवानग्या द्या, आपण पुतळा उभारतो आणि पुतळ्याचे अनावरण करायला  उद्धव ठाकरे यांना बोलावतो. पण, कृपा करून मुंब्र्याला बदनाम करू नका. मुंब्र्याला बदनाम करण्याची जी सवय लागली आहे; ती दूर करण्यासाठी बदलले मुंब्रा एकदा बघायला या. मुंब्र्यात तुमचे स्वागतच होईल,  हेही मी तुम्हाला सांगतो.  मी कळवा – मुंब्र्याचे  प्रतिनिधित्व करतो जिथे ५० टक्के मुस्लिम आहे ५० टक्के हिंदू आहेत.  पण, कृपया मुंब्र्याला बदनाम करू नका ! मुंब्र्यात कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोधक रहात नाही. मतांसाठी हिंदू – मुस्लीम तुष्टीकरण करू नका, असेही डॉ..जितेंद्र आव्हाड म्हणाले. राम मंदिराच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्यानेच आता छत गळत आहे. मी देखील 28 मंदिरे बांधली आहेत. पण, त्याचा गाजावाजा करीत नाही. मुंब्रा स्टेशनच्या बाजूला सुंदर मंदिर बांधले आहे. लोकांकडून वर्गणी गोळा करून तुळजाभवानीचे मंदिर बांधत आहे. देव हृदयात असावा लागतो. त्याचे प्रदर्शन करायचे नसते. मी हिंदू आहे. पण, मंदिरांच्या नावावर द्वेष पसरविणारा नाही. संविधान बाबत त्यांना छेडले असता जे राहुल गांधी यांनी संविधान दाखवले होते;  त्याचा रंग लाल का आहे, याचा अर्थ त्यांनी यावेळी समजून सांगितला. लाल रंगाचा अर्थ प्रेम , हृदय , क्रांतीचा रंग लाल आहे, असे ते म्हणाले. आमचं रक्त सळसळत आहे.  कारण तुम्ही संविधान बदलणार म्हणून !  हृदयाचा रंग लाल आहे त्याचा काय नक्षलवाद्यांशी संबध आहे का, लहान पोरांसारखे खेळ करतात. राज ठाकरे म्हणाले होते की,  मदरशांमध्ये मशिनगन मिळतील; पण, आजही माझे म्हणणे आहे की, मदरशांमध्ये वस्तराही मिळणार नाही. तुम्हाला हिंदूंना मुसलमानांच्या नावाने भडकवायचे आहे,  असेही ते म्हणाले.

बारामतीचा विकास शरद पवारांनी केला

अजित पवार यांनी जाहीर केलेल्या अहवालात बारामतीचा विकास आपण केला असा उल्लेख केला आहे, यावर आव्हाड यांना छेडले असता  बारामतीचा विकास शरद पवार यांनी केला असल्याचे त्यानी स्पष्ट केले. अजित दादांचे योगदान नाकारत नाही, मात्र शरद पवार मायनस म्हणजे बारामती काहीही उरत नाही असेही ते म्हणाले. अजित पवार म्हणत आहेत की, “कधी नव्हे एवढा निधी त्यांनी बारामतीत आणला आहे”. या वाक्यातून त्यांच्या मनातील पराभवाची भीती प्रतित होत आहे. मी कळवा – मुंब्र्यात अद्ययावत रूग्णालय उभे केले आहे. पैशाशिवाय उपचार ही अरविंद केजरीवाल यांची संकल्पना मी माझ्या मतदारसंघात राबविली आहे. आता अजित पवार कॅन्सर हॉस्पिटलची घोषणा करीत आहेत. पण, त्यांना सांगतो की, मी उभारलेल्या हाॅस्पीटलमध्ये कँन्सरसंबधीत सर्व उपचारांची यंत्रणा सज्ज  आहे. अगदी केमोथेरपी, रेडियशन यांचीही व्यवस्था आहे. जे मी केले ते गेली 30 वर्षे मंत्री असलेले अजित पवार आता करीत आहेत. यावरून ते पराभवाच्या भीतीने पछाडले आहेत, हे दिसून येत आहे, असेही डॉ..जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरद पवारांनी संन्यास घ्यावा, असे अजित पवार म्हणाले. त्यावर , संसदीय निवडणूकीतून शरद पवार माघार घेतील पण राजकारणातून त्यांना माघार घेता येणार नाही,  असेही ते म्हणाले. राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय आम्हाला विचारल्या शिवाय ते  घेणार नाहीत, असेही डॉ..जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. लाडकी बहिण कोणाची आहे अजित दादांची आहे , मुख्यमंत्र्यांची आहे की देवा भाऊंची आहे की प्रत्येकाची एक-  एक आहे अशी खिल्ली त्यांनी उडवली. लाडक्या बहिणींची महागाईतील दिवाळी कशी गेली हे या तिघांनीही विचारलेले नाही.  मतांच्या नादात तिजोरीवर भार वाढला आहे.  इथे पोलिसांचा पगार झाला नाही, पुढच्या महिन्यात शासकीय नोकरांच्या पगार होईल की नाही ते सांगता येत नाही केवळ घोषणांचा पाऊस पडायला काय लागत असा सवाल त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *