ठाणे : ईडी, सीबीआय, आयकर विभाग या यंत्रणांचा वापर करून विरोधकांना सतावून आपल्या पक्षात घेण्याचे काम भाजपा करत असल्याचे आम्ही सातत्याने सांगत होतो. मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे तपास यंत्रणाचा गैरवापर होत असल्याचे उघड झाले असून याचबरोबर भाजपची मानसिकताही समोर आली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. शरद पवार यांना सोडून गेलेले आणि आता राज्यात मंत्री असलेले जवळपास सर्वचजण ईडीच्या जाळ्यात होते, असा दावाही त्यांनी केला आहे.
छगन भुजबळ हे ओबीसी असल्यानेच त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली, असा दावा राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यांचा हा दावा शंभर टक्के खरा आहे. ही बाब भुजबळांनीच सांगितलेली असल्याने भाजपचा जातवर्चस्ववादी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली
२०२४ –इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया’ हे राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक आहे. या पुस्तकातील मजकुरानुसार, वयाच्या ७५ व्या वर्षी आपण ईडीची कारवाई सहन करू शकत नव्हतो. म्हणून भाजपसोबत गेलो. आता सुखात आहे, असे छगन भुजबळ हे सरदेसाई यांच्याशी चर्चा करताना म्हणाले होते.
