राहुल गांधींचे गोंदीयात वचन
गोंदिया : देशातील काही उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षांत एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केला नाही? मोदी हे अदानी-अंबानींचे आहेत, ते अंबानीच्या लग्नात गेले पण मी गेलो नाही कारण मी तुमचा आहे, असे सांगत मविआ सत्तेत आल्यास महिलांच्या खात्यात दरमहा खटाखटा तीन हजार रुपये जमा करणार असल्याचे वचन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गोंदीया येथील जाहिर सभेत दिले.
काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची गोंदियात जाहीर सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघा वर हल्लाबोल केला.
शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर शेतकरी रस्त्यावर कशासाठी उतरले होते? भाजपाचे सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन, कापसाला भाव देत नाही.याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. छत्तीसढमध्ये धानाला ३ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले, त्याची पूर्तता केली आहे. कर्नाटकमध्ये महिलांना मोफत बस प्रवास सुरु केला आहे, महालक्ष्मी योजना सुरु केली आहे. महाराष्ट्रात मविआचे सरकार आल्यास दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये खटाखट, खटाखट जमा केले जातील, शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, धानाला बाजारात योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करु, २५ लाखांचा आरोग्य विमा, तरुणांना ४ हजारांचा भत्ता व २.५ लाख सरकारी नोकऱ्यांची भरती करु, असे आश्वासन देत नरेंद्र मोदी मुठभर अरबपतींना जेवढे पैसे देतील तेवढे पैसे काँग्रेस सरकार गरिबांना देईल, असा शब्द राहुल गांधी यांनी दिला.
देशाच्या संविधानात हजारो वर्षापासूनचे विचार आहेत, भगवान बुद्ध, संत बसवेश्वर, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांचे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, संतांचे विचार आहेत, या संविधान समानता, प्रेम, सर्व धर्मांचा आदर आहे पण हे लाल रंगाचे संविधान दाखवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर टीका करतात. या संविधानात लोकांना मारणे, गरीब, शेतकरी यांच्यावर अन्याय, अत्याचार करावे, असे कुठेही लिहिलेले नाही. पंतप्रधान मोदींनी देशाचे हे संविधान वाचलेच नाही. भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदी २४ तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर हल्ले करून ते संपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काँग्रेस मात्र या संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
