कणकवली : महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल, असं इथला दिवटा म्हणाला. यांना जोडे नाही मारायचे तर काय करायचं? महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यातून काही चांगलं होईल म्हणतोस तू? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही. केसरकर आणि इथला यांचा दिवटा पडला तरच माझ्या कोकणचा विकास होईल. काहीही झाले तरी कोकण उद्योगपती अदाणीला आंदण देणार नाही म्हणजे नाही “, असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. ते कणकवणीमध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, अजित पवार म्हणाले की गौप्यस्पोट करतो, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किंवा बनवण्यासाठी जी बैठक झाली त्यात उद्योगपती होते. आता तुम्ही ठरवा हे पन्नास खोके कुठून आले? एका उद्योगपतीने मुंबई घशात घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत, कोकणपण घशात घालतील.
बारसू रिफायनरी होऊ देणार नाही, हे माझं वचन आहे. पर्यावरणाचा रक्षण करून विकास करेन. दीपक केसरकर जेव्हा पराभूत होतील तेव्हा कोकणाचा चांगला विकास होईल.महाराष्ट्र जिंकला की दिल्ली सुद्धा हलेल, त्यामुळे महाराष्ट्रातून दिल्लीच तख्त हलवू. महाराष्टातील सगळे उद्योग धंदे गुजरातला नेऊन आपल्या अशुभ हाताने शिवरायांचा पुतळा उभारणारे ही अवलाद, अशी टीकाही ठाकरेंनी मोदींवर केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी म्हणजे शिवाजी महाराजांचे भक्तच, इथली जनता मोदींनी महाराजांचा पुतळ्याच उद्घाटन केला त्यामुळे भुलली.आठ महिन्यात यांचा आव कोसळला. महाराजांचा पुतळा नसून त्यात आमचा देव आहे. मोदींना एवढ्यासाठी बोलवा, वडिलांना आणि मुलांना खांद्यावर बसून घराणेशाही सुरू आहे. आमची शिवसेना प्रमुखांची घराणेशाही यांना चालणार नाही. मोदींवर कोणते संस्कार आहेत, आमच्या वडिलांचा अपमान करता. तुमची परंपरा कोकणाला मान्य आहे का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
हेलिकॉप्टर न जाता रस्त्याने येऊन दाखवा, असं आव्हान देता. पहिल्यांदा इथले रस्ते नीट बनवा. त्यांच्या साईज प्रमाणे खात मिळालं होत, सूक्ष्म खातं असं म्हणत ठाकरेंनी राणेंना टोलाही लगावला. माझ्या शिवसेनेला जो कोणी नकली बोलेल तो बेअकली आहे. भाजपच्या लेखी शिवसेना संपली असं मत, मग एवढे लोक का जवळ येतात. श्रीधर नाईक चौक पाहिल्यानंतर अंगावर शहर आले. कोकणात गुंडागर्दी माजून हत्यासत्र सुरू झालं, असंही ठाकरे म्हणाले.
ब्रिगेडीअर सुधीर सावंतांचा ठाकरे सेनेत प्रवेश
शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. त्यांचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी ब्रिगेडीअर सावंत म्हणाले,मी दहशतवादाला साथ देणाऱ्या विरोधात कायमच उभा राहीलो आहे. उध्दव ठाकरे यांनी सर्वांना बरोबर घेऊन नवीन महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी दिशा दिली आहे.
