शेतमाल विक्रीसाठी न आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

हरिभाऊ लाखे

नाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बुधवारी (दि. २०) मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद राहणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेतकऱ्यांनी कोणताही शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येऊ नये, असे आवाहन बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केले.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून पालेभाज्या, फळभाज्या व फळे विक्रीसाठी आणल्या जातात. या शेतमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. बाजार समितीत रोज चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल व्यापाऱ्यांमार्गे मुंबई, गुजरात अहमदाबादकडे पाठविला जातो. निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये महामंडळे व मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी.
तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, अशी अधिसूचना ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने शाळा-महाविद्यालयांनाही सुटी जाहीर केली आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद राहणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.
मतदानासाठी कामगारांना पगारी सुट्टी
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी (दि. २०) कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याच्या सूचना कामगार उपआयुक्तांनी केल्या आहेत. उद्योजकांकडूनही मतटक्का वाढवण्यासाठी पुढाकार घेतला जात असून, बहुतांश कंपन्यांनी यापूर्वीच सुट्टी जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या वतीने दुकाने, खाद्यगृहे, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, कंपन्या, मॉल कर्मचारी, कामगार व अधिकाऱ्यांना दि. २० रोजी भरपगारी सुट्टी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *