हरिभाऊ लाखे
नाशिक : महाराष्ट्र ई वाहन धोरणानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक-बोरिवली मार्गावर १२ मीटरच्या ई बस चालविण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या सेवेस प्रवाशांचा प्रतिसाद लाभला. मतदानाचा दिवस असल्याने अनेकांनी मतदानानंतर बाहेर प्रवास करण्यास पसंती दिली.
राज्य परिवहन महामंडळाकडून ई वाहन धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक, बोरिवली, कसारा, सप्तश्रृंगी गड या मार्गांवर ई बससेवा सुरू आहे. सद्यस्थितीत नाशिक-बोरिवली मार्गावर धावणाऱ्या नऊ मीटर ई बस या सप्तश्रृंगी गड, नाशिक- कसारा आणि नाशिक- पिंपळगाव मार्गावर धावत आहेत. त्यामुळे नाशिक -सप्तश्रृंगी गड मार्गावर सहा तर नाशिक कसारा मार्गावर दोन अतिरिक्त फेऱ्या बुधवारपासून सुरू झाल्या. मुंबई नाका परिसरातील महामार्ग ब स्थानकात ज्येष्ठ नागरिक सुभाष कुलकर्णी यांच्या हस्ते तसेच विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, आगार व्यवस्थापक रोहिणी ठाकरे, प्रताप राजपूत आणि पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत नाशिक- बोरिवली शिवाई बसचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रवाशांना पेढे तसेच गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या साधारण बस या मतदान प्रक्रियेत कार्यरत होत्या. यामुळे शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बससेवेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. प्रवाशांचा या बससेवेस चांगला प्रतिसाद राहिला.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *