कराड : भाजपच्या नेत्यांकडून मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय (ओबीसी), आदिवासी विरुद्ध धनगर, हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित असे विभाजन करण्याचा प्रयत्न झाला. हे राज्याच्या भविष्याकरिता धोकादायक असून, महाराष्ट्रात असे कधीही घडले नव्हते, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीने जाती-पातीचे राजकारण बिलकुल केले नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ‘मविआ’तर्फे काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभव झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कराड दक्षिणच्या मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचे स्पष्ट करीत विजयी झालेल्या भाजप उमेदवार डॉ. अतुल भोसले तसेच राज्यातील नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचे पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिनंदन केले. ‘कराड दक्षिण’मध्ये विजयी झालेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सुटावेत. त्यासाठी आपले निश्चित सहकार्य राहणार असल्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली. माझ्यावर मतदार नाराज का झाले? मी कुठे कमी पडलो? याचे विश्लेषण मला करावे लागणार आहे. मी पदावर नसलो तरी कराडकरांची सेवा करत राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आपल्यासाठी झटलेल्या सर्व कार्यकर्ते, मतदारांचे त्यांनी आभारही मानले.
राज्यातील सर्व सहकाऱ्यांशी बोलणार असून, निवडणुकीबद्दल निश्चितपणे बरेचशे तर्कवितर्क आहेत. त्यामुळे आताच एकदम भाष्य करणे योग्य नाही. काही लोकांचे म्हणणे आहे की निवांत झालो की बोलूया. हरियाणाचा निकाल थोडासा नकारात्मक गेला हे खरे आहे. त्याची चिंता आम्ही करत आहोत. महाविकास आघाडीने राज्यभर ठरवून काही जातीपातीचे राजकारण केले हे बिलकुल खरे नाही. मराठा आंदोलनाचा आणि महाविकास आघाडीचा थेट काही संबंध नाही. विरोधकांनी काही भूमिका घेतली. पण, त्याचा फार प्रभाव पडला नसल्याचे मत चव्हाणांनी व्यक्त केले.
विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीच्या तुलनेमध्ये याखेपेस खूप चांगला पाठिंबा मिळेल असे आपल्याला वाटले. पण, मतदारांनी एकदम राज्यभर असा धक्कादायक निर्णय का घेतला हा प्रश्न आहे. सगळे निकाल एकसारखे दिसत आहेत. सगळ्या जागा आमच्याच पडल्या आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करायला कमी पडलो का? हे पाहणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
आपणाला केंद्रात आणि राज्यात काम करायची संधी मिळाली. हे सगळे आपल्या मतदारांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले. पण, मतदार का नाराज झाले, मी कुठे कमी पडलो याचे विश्लेषण मला करावे लागणार आहे. मी कोणत्याही पदावर असलो नसलो तरी कराडकरांची सेवा करत राहणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *