बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद

 

बदलापूरः गेल्या काही दिवसांपासून निरभ्र आकाश आणि रात्री तापमानात होत असलेली घट यामुळे ठाणे जिल्हा गारेगार झाला आहे. दिवसा येणारी कोरडी हवा आणि आर्द्रता कमी असल्याने तापमानात घट होते आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी ठाणे जिल्ह्यात सरासरी १४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी तापमान १३.५ अशं सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर कर्जत ते ठाण्यापर्यंत गारवा जाणवला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वदूर गारवा जाणवतो आहे. मंगळवारी ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान १४ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते. सर्वात कमी तापमान बदलापूर शहरात नोंदवले गेले. बदलापुरात सकाळी १३.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. तर शेजारच्या अंबरनाथ शहरातही १३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पनवेल, पलावा, उल्हासनगर, कल्याण या शहरांमध्ये १४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. तर डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे शहरात सरासरी १५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.

रात्री निरभ्र आकाश असल्याने तापमानात घट होते आहे. त्यात दिवसा ईशान्येकडून येणारी कोरडी हवी आणि आर्द्रता घटल्याने तापमानात घट होते आहे, अशी माहिती मोडक यांनी दिली आहे. येत्या ३० नोव्हेंबरपंर्यत तापमान अशाच प्रकारे कमी होत जाणार असल्याचेही मोडक यांनी सांगितले आहे. हवामानात गारवा असल्याने सकाळच्या सुमारास स्वेटर, कानटोपीचा वापर वाढला आहे. रेल्वेने प्रवास करणारे नोकरदार थंडीपासून रक्षण करण्यासाठी स्वेटर वापरत असल्याचे दिसते आहे. अनेक जण या थंडीचा आनंद घेण्यासाठी सकाळी घराबाहेर पडत आहेत.

शहरनिहाय तापमान

बदलापूर १३.५

अंबरनाथ १३.६

पनवेल १४

पलावा १४.३

उल्हासनगर १४.५

पालघर १४.६

कल्याण १४.७

डोंबिवली १५

नवी मुंबई १६

ठाणे १६.६

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *