अर्ज करण्याची ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत
ठाणे : शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रिंट सर्व कागदपत्रांसह सहायक आयुक्त कार्यालयात जमा करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशास पात्र असून शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहित मुदतीच्या अगोदर अर्ज करून त्याची प्रिंट सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, 4 था मजला, दत्तवाडी, खारेगाव, कळवा, जि. ठाणे. ४००६०५ या कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन इंगळे यांनी केले आहे.
0000
