माथेरान : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली आहे.परंतु वाहतुकीच्या गहन समस्यांना सामोरे जात प्रवास करावा लागत असल्यामुळे लवाजम्यासह आलेल्या पर्यटकांची त्रेधातिरपीट उडत आहे.
ई रिक्षाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कधी नव्हे एवढी पर्यटकांची गर्दी याठिकाणी पाहावयास मिळत आहे. ई रिक्षाच्या स्टँडवर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न करता कोणत्याही बंदोबस्ताशिवाय ई रिक्षा संघटना उत्तम प्रकारे सेवा देत आहेत.विशेष म्हणजे या ई रिक्षाच्या स्वस्त आणि सुरक्षित सेवेचा लाभ घेण्यासाठी पर्यटक सुध्दा आपला अमूल्य वेळ खर्च करून ताटकळत उभे राहून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. या सेवेचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला असून फक्त वीस रिक्षांच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देणे चालकांना त्रासदायक बनले आहे. संघटनेची त्यांच्या हक्काची उर्वरीत एकूण ७४ बाकी असलेल्या ई रिक्षांची मागणी आहे. या सर्व रिक्षा उपलब्ध झाल्यास सर्वाना प्रवास सुखकर होणार असून यापुढेही इथे मोठया प्रमाणावर पर्यटन क्रांती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने आणि संबंधित समितीच्या अधिकाऱ्यांनी लवकरच ई रिक्षांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे.शाळेच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांना वीस पैकी पंधरा रिक्षा सेवा देत असतात तर उर्वरित पाच रिक्षा प्रवाशांना अपुऱ्या पडतात. मुख्य म्हणजे ई रिक्षाला ज्या लोकांचा आजही विरोध कायम आहे तीच मंडळी प्रामुख्याने या सेवेचा लाभ घेत आपल्या कुटुंबातील सदस्यांना लाभ घेण्यास सांगत आहेत. त्यातच अप्रत्यक्षपणे ई रिक्षाला विरोध करणारी काही राजकीय पक्षांची नेतेमंडळी सुध्दा स्वतःला या सेवेचा लाभ घेताना कुणी कानपिचक्या देईल यासाठी लाजून आपल्या हॉटेल जवळ मर्जीतील चालकांमार्फत ई रिक्षा मागवून लाभ घेताना दिसत आहेत.
आमच्यासाठी ई रिक्षांची सुविधा उपलब्ध केली आहे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. पण इथे एवढे टुरिस्ट येत असतात तर वीस रिक्षा खूपच कमी आहेत. गव्हर्नमेंटने या ठिकाणी अजूनही रिक्षांना प्राधान्य दिले तर आमचा वेळ वाचेल आणि इथे टुरिस्ट जास्त प्रमाणात येतील त्यामुळे इथल्या गोरगरिबांना रोजगार मिळेल.
निरंजन हातनोलकर—-पर्यटक मुंबई
————————————————–
गर्दीच्या वेळी पर्यटकांना ई रिक्षाच्या रांगेचे नियोजन मी निस्वार्थीपणे करीत असतो. ई रिक्षाची संख्या कमी असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना तासनतास ई रिक्षाची वाट पहावी लागते यासाठी सनियंत्रण समितीने ई रिक्षाची संख्या वाढवावी. पायलट प्रोजेक्टचा कालावधी पूर्ण झाला आहे.
जनार्दन पार्टे —सामाजिक कार्यकर्ते,माथेरान
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *