मुंबई : राज्यात थंडीचा जोर कमी झालाय असं वाटत असताना आता पुन्हा एकदा राज्यात थंडी वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे गुरुवार 2 जानेवारीपर्यंत वातावरणातला ऊबदारपणा हळूहळू कमी होत जाणार आहे.

शुक्रवार, 3 जानेवारीपासून त्यापुढील पाच दिवसासाठी म्हणजे मंगळवार, 7 जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. त्यातही विशेषतः उत्तर महाराष्ट्र व उत्तर विदर्भातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात त्या पाच दिवसात थंडीचा प्रभाव अधिक राहील, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याची माहिती देखील खुळे यांनी दिली आहे. पुढचे काही दिवस थंडीचे आहेत. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा. या दिवसाच्या थंडीचा लाभ उठवावा.

राज्यातील काही भागात गारठा वाढला

हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उत्तरेकडील राज्यांनंतर आता राज्यातही काही भागात थंडीच्या लाटेला सुरुवात होणार आहे.  विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट असून पहाटे दाट धुक्याची चादर, तापमान निचांकी राहण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा खालावलाय. बोचऱ्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र गारठलाय. ठिकठिकाणी शेकोटीच्या उबेला नागरिक बसल्याचं चित्र दिसत असून दुपारपर्यंत गारठा कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलय. विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान प्रचंड घसरले आहे.

बदलत्या वातावरणात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणं गरजेचं

दरम्यान, या बदलत्या वातावरणात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा. या दिवसाच्या थंडीचा लाभ उठवावा, असेही खुळे यावेळी म्हणाले. दरम्यान, बदलत्या वातावरणा शेती पिकांना फटका बसत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *