Month: December 2024

सिंहस्थासाठी हवा स्वतंत्र कक्ष

 ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडली हरिभाऊ लाखे नाशिक : नियोजनासाठी दरवेळी आव्हानात्मक ठरणारा नाशिकचा सिंहस्थ अवघ्या २२ महिन्यांवर आला असून, जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर दर मंगळवारी नियोजन बैठकाही सुरू झाल्या आहेत. एव्हाना सिंहस्थ नियोजनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन होऊन तेथे पूर्णवेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक होणे आवश्यक होते. परंतु, अधिकारी, कर्मचाऱ्यांची फाइल सरकारदरबारी पडून असल्याने नियोजनाला गती येण्यास अवधी लागणार आहे. नाशिकचा सिंहस्थ पावसाळ्यात होत असल्याने त्याचे नियोजन करणे आव्हानात्मक काम असते. साधू-महंतांसह लाखोंच्या संख्येने शाही स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करताना प्रशासनाचा कस लागतो. त्युामुळे १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचे किमान दोन ते तीन वर्ष आधी नियोजन सुरू करावे लागते. सन २०१५ नंतर आता सन २०२६-२०२७ मध्ये सिंहस्थ होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आले असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे हा विषय काहीसा मागे पडला होता. आता निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सिंहस्थाची दर मंगळवारी आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक दोन बैठका झाल्या असून, स्वतंत्र सिंहस्थ कक्ष सुरू होणे आवश्यक आहे. आगामी सिंहस्थात ५० लाख साधू-महंत आणि पाच कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. सर्व विभागांची कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी व जिल्हास्तरावर यंत्रणांच्या समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष तातडीने स्थापन करणे आवश्यक आहे. सिंहस्थाचे नियोजन अनेक यंत्रणांना सोबत घेऊन करावे लागते. त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र कक्षाची आवश्यकता आहे. परंतु, या कक्ष स्थापनेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या कक्षात ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, लिपिक व अन्य कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यासंदर्भातही जिल्हा प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, तो अद्याप धूळ खात पडला आहे.

– एड्स जनजागृती प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या ठाणे : जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने जागतिक एड्स दिन-२०२४ जनजागृतीपर प्रभात फेरी व विविध…

क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी ठाणे कार्यालयांतर्गत विविध उपक्रम व योजना

ठाणे –  राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या धोरणानुसार सन 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे योजिले आहे. जिल्हा ठाणे मधील क्षयरुग्ण परिणामकारक बरे होण्याची टक्केवारी सन 2023 – 95 टक्के…

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम व पल्स पोलिओ मोहिम प्रभावीपणे राबवा

  जिल्हास्तरीय टास्क फोर्समध्ये आवाहन ठाणे : ठाणे जिल्ह्यात ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच 8 डिसेंबर रोजी उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या दोन्ही मोहिमांची तयारी पूर्ण झाली असून आरोग्य यंत्रणांनी दोन्ही मोहिमा प्रभावीपणे राबवावी व एकही बालक यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आज जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत करण्यात आले. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम व उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम तसेच नियमित लसीकरण मोहिमेच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांच्यासह जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमा यशस्वीपणे राबविण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांला जंतनाशकाची गोळी देण्यात यावी. तसेच यासाठी सर्व शासकीय शाळा, खासगी शाळांमध्ये योग्य ती खबदारी घेण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांनाही जंतनाशक गोळ्या तसेच पोलिओ डोस मिळेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या विट भट्टी परिसरातील नागरिकांच्या मुलांनाही जंतनाशक गोळ्या व पोलिओ डोस देण्यात यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ ते १९ वर्षे वयोगटातील चार लाख ५६ हजार ३५२ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला – मुलींमध्ये अॅनेमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे इत्यादी आजारांचा धोका उद्भवतो.  त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी जंतनाशकाची गोळी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे. महिला व बालविकास विभाग, पाणी पुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग तसेच शिक्षण विभागाच्या एकत्रित सहभागाने व समन्वयाने संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा कार्यक्रम शाळा व अंगणवाड्यामध्ये ४ डिसेंबर २०२४ व जंतनाशक मोहिमेच्या दिवशी जी मुले उपस्थित राहणार नाहीत त्यांना १० डिसेंबर २०२४ रोजी (मॉप अप दिवशी) गोळ्या देण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन स्तरावर प्रशिक्षण दिले असून सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नोडल शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कलाछंदचा कला अविष्कार दादरमध्ये करा : पद्मश्री उदय देशापांडे

ठाणे :’ भूतलावर तन-मन-धन ओतून रेखाटलेली माझी रांगोळी अल्पायुषी आहे. उद्या ती पुसली जाणार आहे. याची जाण असुनही रंगावळीकार रांगोळ्या काढताहेत दुसऱ्याला नेत्रसुख देताना स्वत: कलाविष्काराचा आनंद या श्री आनंद…

डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे होणार पुर्नसर्व्हेक्षण

डहाणू : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू- नाशिक या रेल्वे मार्गाची, अनेक दशकांची मागणी आहे. सदरची मागणी काही वर्षासाठी कालबाह्य झाली होती. मात्र, खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी ही मागणी पुन्हा पुर्नजीवीत केली आहे. या रेल्वे मार्गाचे पुर्नसर्व्हेक्षण होणार आहे. त्यासाठी  2  कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी खासदार डॉ.हेमंत सवरांनी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वेमार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  डहाणू- नाशिक रेल्वे सुरू करण्याची मागणी, या भागाचे पहिले तत्कालीन खासदार, जव्हार संस्थान चे राजे यशवंतराव मुकणे यांनी  1950  मध्ये केली होती. त्यानंतर या मागणीचा पाठपुरावा दिवंगत खासदार अॅड चिंतामण वनगा यांनी दोन तीन दशके केला आहे. दरम्यानच्या काळात तत्कालीन रेल्वे मंत्री राम नाईक यांच्या कार्यकाळात डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वे सुरू होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, नंतरच्या काळात या रेल्वे मार्गाची मागणी कालबाह्य झाली होती. आता पुन्हा पालघर चे खासदार डॉ.हेमंत सवरांनी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणी ला पुर्नजीवीत केले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या रेल्वे मार्गाच्या पुर्नसर्व्हेक्षणाला परवानगी दिली आहे. त्यासाठी दोन कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मार्गाची गरज…… आदिवासी भागात खरीप पीकाव्यतिरीक्त अन्य ऊत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे येथील आदिवासी, रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरीत होतात. या भागात कारखानदारी अथवा औद्योगिक वसाहत नाही. स्थानिक ठिकाणी महिला बचत गटांकडून उत्पादित अथवा तयार केलेल्या मालाला बाजारपेठ ऊपलब्ध होत नाही. शिक्षीत तरूणांना रोजगार नाही. त्यामुळे या भागात रेल्वे मार्ग झाल्यास, सर्व सुविधा तसेच रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाची गरज आहे. पुर्नसर्व्हेक्षणात आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड या तीन आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्यात यावा. या तालुक्यातील मुख्य बाजारपेठांलगत सदरचा रेल्वे मार्ग व्हावा, तसे सर्व्हेक्षण करावे अशी मागणी, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर. ००००  

प्रख्यात रेकी तज्ज्ञ डॉ. प्रवीण गोपालदास पुरेचा भाटिया मृत्यूच्या दाढेतून बचावले

डॉ. पराग अजमेरांच्या उपचाराला यश  मुंबई  : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रवीण भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात प्रख्यात ह्रुदयरोग तज्ज्ञ डॉ. पराग अजमेरा यांना यश मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र मिशन पीस UN चे राजदूत दहिसर येथील प्रख्यात रेकी तज्ज्ञ डॉ. प्रवीण गोपालदास पुरेचा भाटिया यांना चक्कर आल्याने आणि उजवा हात व पाय संवेदनाहीन झाल्याने बोरिवली मुंबईतील अरिहंत हॉस्पिटलमधील इंटेसिव्ह कार्डियाक केअर युनिट (ICCU) मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या मुलाने त्यांना त्वरीत अरिहंत हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ पराग अजमेरा यांनी तपासणी केली आणि तपासणीत डॉ. पुरेचा भाटिया यांना सोडियमची पातळी कमी, हिमोग्लोबिन कमी, फॅटी लिव्हर आणि मेंदूला रक्तपुरवठा करण्यात अडथळा येत असल्याचे निदान केले. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर इंट्राव्हेनस औषधे दिली गेली. ते धोक्याबाहेर असले तरी अजमेरा यांनी त्यांच्यावर दीर्घकालीन उपचारांचा सल्ला दिला आहे. डॉक्टर पुरेचा भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात डॉ. पराग अजमेरांच्या प्रयत्नांना यश आले, उपचाराला प्रतिसाद मिळाला आणि आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु त्यांना विश्रांती घेण्याचा आणि पाहुण्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉ. प्रवीण भाटिया यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय जनता पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, भारतीय जनता पक्षाचे नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेकांना आपल्या अल्टरनेट मेडिसीन आणि रेकी यांच्या माध्यमातून उपचार केले आहेत.  ते सेंट्रल कौन्सिल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन इंडिया चे डायरेक्टर आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोपालजी मावजी पुरेचा यांचा वारसा लाभलेल्या डॉ. प्रवीण भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आल्या बद्दल डॉ. पराग अजमेरा यांचे दहिसर बोरीवली येथील नागरिकांनी आभार मानले आहेत.

भीषण आगीत खासगी बँकेचे ११ एसी जळून खाक;

सुदैवाने कुणालाही दुखापत नाही मुंब्राः  बँकेच्या वातानाकुलित (एसी) यंत्राना लागलेल्या भीषण आगीत ११ आऊटडोअर युनिट पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सकाळी मुंब्र्यात घडली. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा शहरातील कौसा भागातील नशेमन गृहसंकुलाच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर एका खाजगी बँकेची शाखा आहे.या बँकेच्या तळ मजल्यावरील एसी युनिटला सोमवारी सकाळी पावणेसात वाजता भीषण आग लागली.याबाबतची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या खाजगी कंपनीचे कर्मचारी आणि मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने अथक प्रयत्नानी आग विझवली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु बँकेचे ११ एसी आऊडडोअर युनिट पूर्णपणे जळून खाक झाले.आगीची झळ  बँकेच्या जवळ असलेल्या मोबाईल आणि  कपड्याच्या दुकानांना देखील बसली.यात दुकानांचे  किरकोळ नुकसान झाले असल्याची माहिती ठामपाच्या आप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.

तुम्हाला माजी मंत्री ओळखता येत नाही का?

शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर गाडी अडवताच शिवतारे संतापले ठाणे : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजही सर्व बैठका रद्द केल्या आहेत. घशामध्ये इन्फेक्शनचे कारण सांगितले जात असून दोन दिवसांपूर्वी दरे गावी गेलेले असतानाही ते आजारी पडले होते. यानंतर रविवारी दुपारी ते ठाण्यात परतले होते. शिंदे यांचे आजारपण आणि मुख्यमंत्रिपदाचे भिजत घोंगडे याचे कनेक्शन राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. अशातच शिंदेंच्या बंगल्यावर शिवसेनेचे आमदार ये-जा करत आहेत. यावेळी विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचे दिसले. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी गाडी अडवल्याने आमदार विजय शिवतारे संतप्त झाले होते. शिंदेंच्या ठाण्याताली निवासस्थानाबाहेर शिवतारेंची पोलिसांनी गाड़ी अडविली व कोण म्हणून चौकशी केली. यावेळी शिवतारेंनी तुम्हाला आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाही का? असा सवाल पोलिसांना केला. शिवतारे यांना मुख्यमंत्री काही भेटले नाहीत. यामुळे शिवतारे यांची श्रीकांत शिंदे यांनी उठबस केली. बाहेर आल्यावर शिवतारेंनी शिंदेंनी अशी कोणतीही आमदारांची बैठक बोलविलेली नाही, असे सांगितले. दोन दिवस मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना ताप आला होता. कालच ते दरेगावातून मुंबईत आले. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो, अजूनही ते उपचार घेत आहेत, असे शिवतारे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांची भेट झाली. आता एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी आहे. आज कोणत्याही बैठका नव्हत्या. खातेवाटपाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, ते जे ठरवतील ते सर्वांना मान्य असेल, असेही शिवतारे म्हणाले.

चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात पुन्हा सवलत मिळणार?

मुंबई : भारतीय जनता पार्टीप्रणित महायुतीचे सरकार स्थापन होण्याचे निश्चित झाल्यानंतर विकासकांची अनेक महिन्यांपासूनची चटईक्षेत्रफळातील अधिमूल्य सवलतीची मागणी मान्य होण्याची शक्यता आहे. या बाबतचा प्रस्ताव तयार असून १५ डिसेंबर ते १५ जूनपर्यंत साधारणत: सहा महिन्यांसाठी चटईक्षेत्रफळाच्या अधिमूल्यात सवलत देण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र ही सवलत किती असेल, याबाबत या सूत्रांनी मौन धारण केले. या बदल्यात विकासकांनी घरखरेदीदारांना फायदा द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आल्याचे कळते. करोनाच्या काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात ५० टक्के सवलत दिली होती. त्यावेळी एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारिख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने सविस्तर अभ्यास करून सध्या असलेले अधिमूल्य भरमसाठ असून ते कमी करावे, अशी सूचना केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने वर्षभरासाठी चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात ५० टक्के सवलत दिली होती. त्यामुळे पालिका, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित अनेक प्रकल्पांत विकासकांनी लाभ उठवला होता. महायुती सरकारने समूह पुनर्विकासासाठी अधिमूल्यात वर्षभरासाठी ५० टक्के सवलत दिली होती. आता अधिमू्ल्यात पुन्हा सवलत पुन्हा मिळावी, याबाबत विकासकांकडून वेळोवेळी शासनाकडे मागणी केली जात आहे. माजी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले होते. याबाबतचा प्रस्तावही त्यावेळी तयार करण्यात आला होता. परंतु मावळत्या सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही. आता नव्या सरकारकडून याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. करोना काळात चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात दिलेल्या सवलतीच्या बदल्यात घरखरेदीदारांना लागू होणाऱ्या मुद्रांक शुल्काचा संपूर्ण भार संबंधित विकासकांनी उचलावा, अशी अट घालण्यात आली होती. विकासकाने तसे पत्र करारनामा नोंदणीकृत करताना नियोजन प्राधिकरणाला सादर करावा आणि संबंधित प्राधिकरणाने याबाबतची यादी उपनिबंधक कार्यालयाला द्यावी, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. ज्या विकासकांनी असा लाभ दिलेला नाही, त्यांना चटईक्षेत्र‌फळ अधिमूल्यात सवलत न देण्याचे ठरविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा विकासकांच्या संघटनेने कंबर कसली असून यावेळी नक्की सवलत मिळेल, असा विश्वास त्यांना वाटत आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची दरवाढ झालेली असून विकासकांना विविध शुल्कांपोटी ४० ते ४५ टक्के अधिमूल्य भरावे लागत आहे. त्यात सवलत मिळाली तर बांधकाम व्यवसायाला संजीवनी मिळेल, असा विश्वास विकासकांकडून व्यक्त केला जात आहे. ०००००