पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या मुळ प्रकरणात पवनचक्की कंपनीकडे तीन कोटींच्या खंडणीच्या मागणीचे आदेश हे धनजंय मुंडे यांच्याच बंगल्यातून गेले होते. तीन कोटीपैंकी पन्नास लाखांची पहीली खंडणीही पोहचवण्यात आली होती असा खळबळजनक दावा करीत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी कळकळीची विनंती भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी यांच्या विरोधात बोलतोय असं नाही. जर तसं असेल तर मी शांत बसतो, घाना देशात राहून जातो पण तुम्ही संतोष देशमुखला परत आणाल का? त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्याल का? असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विचारला. जोपर्यंत संतोष देशमुखचे मारेकरी फासावर जात नाही तोपर्यंत मनात राग ठेवा असं आवाहन त्यांनी केलं. तसेच बीडचा बिहार नाही तर यांनी हमास आणि तालीबान करून ठेवलाय अशी जहरी टीका सुरेश धस यांनी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांनी बीडचा बिहार नाही तर हमास, काबुलीस्तान आणि तालिबान केला असल्याची टीका सुरेश धस यांनी केली. ते म्हणाले की, “माझा रंगही काळा आहे. तुम्ही म्हणाल तर घाना देशात जाऊन राहतो. पण मग संतोष देशमुखला परत आणू शकाल का? संतोष देशमुख तिसऱ्यांदा सरपंच झाला. पण अजून त्याच्या कुटुंबीयांना राहायला घर नाही. त्यांना न्याय मिळालं पाहिजे, यात कसलं राजकारण आहे?”

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिनखात्याचा मंत्री करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली. या आधी अनेकांनी राजीनामा दिले. आर आर पाटील, विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. महायुतीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो. यांचा राजीनामा घ्या, आमच्या मुलाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *