मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील (एमएमआरडीए) सर्व मेट्रो प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करावे. कोणत्याही मेट्रोमार्गाला विलंब न होता पुढील वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किमी मेट्रोमार्ग कार्यान्वित होईल, यासाठी नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिले. कारशेडशिवाय मेट्रो प्रकल्प सुरू करण्यासाठीही पर्यायी उपाययोजना करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आरे कारशेड प्रकल्प रखडल्यामुळे मेट्रो तीन प्रकल्पामध्ये अनेक अडचणी आल्या. पण आता एक टप्पा सुरू झाला असून अन्य टप्प्यांची कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, जगात अनेक ठिकाणी कारशेडशिवाय मेट्रो प्रकल्प सुरू होत आहेत. त्यासाठी विविध प्रयोग व तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहेत. त्याचा अभ्यास करून येथील मेट्रोमार्गही कारशेड होईपर्यंत न थांबविता कार्यान्वित करावेत, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. पुढील काही वर्षातील नियोजित मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेऊन कारशेडसाठी आतापासूनच जागा आरक्षित करण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी किमान २३ किमी मेट्रोमार्ग सुरू होईल आणि मेट्रो तीनमुळे त्यात २०-२५ किमीची भर पडणार आहे. पण पुढील वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किमी मेट्रोमार्गाची भर पडेल, यादृष्टीने नियोजन करून कामाचा वेग वाढवावा, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *