ओम पर्वत, बद्रीनाथ आणि केदारनाथ यासह मध्य हिमालयाच्या उंच टेकड्यांवर नोव्हेंबरपासून बर्फवृष्टी सुरू होते. यंदा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बर्फवृष्टी सुरू झाली आहे; पण उंच टेकड्यांवर हा बर्फ जास्त काळ राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वैज्ञानिक चिंतित असून हिमालयीन प्रदेशासह मोठ्या नद्यांच्या पाणलोट आणि लाभक्षेत्रात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ईशान्येचा भाग वगळता उर्वरित हिमालयीन प्रदेशात या वर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पाऊस कमी झाला तर बर्फ कमी पडेल. त्याचा हिमालयाशी संबंधित पाच देशांवर व्यापक प्रभाव पडतो. कारण हिमालय हा आशियाचा जल स्तंभ असण्याबरोबरच या खंडाचा हवामान नियंत्रकदेखील आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारताच्या बहुतेक भागात आणि पूर्व आणि ईशान्य भारताच्या काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. येत्या काळात दक्षिण भारतातील द्वीपकल्पीय भागात सामान्यपेक्षा 121 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, दक्षिण पॅसिफिक महासागरात तटस्थ ‘अल निनो’ परिस्थिती आहे, तर ‘ला निना’ परिस्थिती आणखी विकसित होऊ शकते. त्यामुळे भारतीय हवामानावर परिणाम होऊ शकतो. हिमालयातील बर्फवृष्टीवर कमी पावसाचा थेट परिणाम होतो. कारण हिमवर्षाव पावसाच्या स्वरूपात होतो; पण ते तापमान आणि उंचीवर अवलंबून असते. कमी पावसामुळे, हिमालयातील उंच शिखरे आणि खोऱ्यांना बर्फाऐवजी हलका पाऊस किंवा कोरड्या हवामानाचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांच्या मते, हिमालयात कमी पाऊस आणि कमी बर्फवृष्टीची मुख्य कारणे म्हणजे जागतिक हवामानबदल, ‘अल निनो’चा प्रभाव, वातावरणातील दाब आणि मानवी क्रियाकलापांतील बदल. वातावरणातील दाबाच्या नमुन्यातील बदलांमुळे उत्तर-पश्चिमी वारे हिमालयाच्या वरच्या भागात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी कमी होऊ शकते.
जागतिक हवामानबदलामुळे तापमान वाढत आहे. त्याचा परिणाम बर्फवृष्टीच्या प्रक्रियेवर होतो. उष्णता वाढली की बर्फाऐवजी पाऊस अधिक पडू लागतो. याव्यतिरिक्त, पृथ्वीच्या हवामानचक्रात नैसर्गिक बदल आहेत, जसे की आंतरमॉन्सून आणि मॉन्सून ब्रेक्स. त्यामुळे हिमालयाच्या प्रदेशात कमी पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. कमी हिमवर्षाव म्हणजे बर्फ वितळणे. त्याचा थेट परिणाम नद्यांच्या जलपातळीवर होतो. यामुळे पाण्याचे संकट उद्भवू शकते. त्याचा परिणाम शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांवर होतो. गंगा, यमुना, सतलज, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या ग्लेशियरवर आधारित नद्या भारतीय उपखंडासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण या नद्या केवळ पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्त्रोत नसून शेती, उद्योग, वीजनिर्मिती आणि पिण्याच्या पाण्यामध्येही मोठी भूमिका बजावतात. या नद्यांवर मोठे जलविद्युत प्रकल्प सुरू आहेत आणि आणखी अनेक बांधकामे सुरू आहेत. त्यांना कमी बर्फवृष्टीचा फटका बसेल.
हिमवर्षाव कमी झाल्यामुळे हिमनद्या झपाट्याने वितळू लागतात. परिणामी, हिमालयीन प्रदेशातील पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे नंतर बर्फाचे वादळ, पूर आणि भूस्खलन यासारख्या आपत्ती उद्भवू शकतात. कमी बर्फवृष्टीमुळे, तापमान वाढल्यामुळे पर्यावरणीय प्रणाली असंतुलित होते. हिमवर्षावाचे एक नैसर्गिक कार्य म्हणजे सूर्याची किरणे (अल्बेडो इफेक्ट) परावर्तित करणे. बर्फ कमी असतो, तेव्हा जास्त उष्णता शोषली जाते. त्यामुळे जागतिक तापमान वाढते. हिमालयात कमी बर्फवृष्टीमुळे भारतीय मॉन्सून आणि पावसाच्या पद्धतींवरही परिणाम होऊ शकतो. वाढत्या उष्णतेमुळे मॉन्सूनची दिशा आणि स्वरूप बदलू शकते. त्यामुळे असामान्य पाऊस आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. हिमालयातील बर्फवृष्टी कमी झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात घट होऊ शकते. रब्बी आणि खरीप पिकांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. हिमालयीन प्रदेशात स्कीइंग, ट्रेकिंग आणि बर्फावर आधारित इतर पर्यटन उपक्रम खूप प्रसिद्ध आहेत. बर्फवृष्टी कमी झाल्यामुळे या क्रियाकलापांचे आकर्षण कमी होऊ शकते. त्याचा पर्यटन उद्योगावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम स्थानिक रोजगार आणि आर्थिक क्रियाकलापांवर होऊ शकतो. या स्थितीत हिमालयातील हवेचा दाब आणि वायुगतीकीमध्ये बदल होऊ शकतो. यामुळे वायू प्रदूषणाची पातळी वाढून श्वसनाचे आजार आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
हिमालयात कमी बर्फवृष्टीमुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होऊ शकतात. अतिउष्णतेमुळे उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत सरकार आणि सामान्य जनतेने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी अगोदरच तयार राहणे आवश्यक आहे. खास रचनेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओम पर्वतावरील बर्फापासून बनवलेला ओमचा आकार काढून टाकण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते तो काढणे हे जागतिक आणि स्थानिक पर्यावरणीय संकटाचे प्रतिबिंब आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात हा बर्फ गायब झाला. शास्त्रज्ञांच्या मते ओम पर्वत भारत, चीन आणि नेपाळच्या सीमेवर स्थित आहे आणि समुद्रसपाटीपासून सुमारे 5900 मीटर उंचीवर आहे. हा पर्वत कैलास मानसरोवर यात्रेतही महत्त्वाचा थांबा आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या लिपुलेखपर्यंतचा रस्ता तयार झाल्यानंतर येथील पर्यटकांची संख्याही वाढली आहे. अल्मोडा येथील ‘सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल असेसमेंट अँड क्लायमेट चेंज सेंटर’चे जे. सी. कुनियाल यांच्या म्हणण्यानुसार, जगभरात हंगामी बदल दिसून येत आहेत. ओम पर्वतावरही हवामान बदलाचा परिणाम दिसून येत आहे. जागतिक तापमान वाढत आहे आणि त्याचा सर्वाधिक परिणाम हिमनद्यांवर होत आहे.
जंगलाला आग लागण्याच्या घटना आणि त्याची व्याप्ती वाढत आहे, हे विशेष. जंगलातील आगीतून निघणारा काळा कार्बन हिमनद्यांवर परिणाम करतो. हिमनदीच्या चांगल्या आरोग्यासाठी त्याच्या खाली असलेल्या झुडपांमध्ये चांगले गवत असावे. अल्पाइन प्रदेशातील जंगलांचे आरोग्य चांगले असावे. या सगळ्यामुळे तापमान संतुलित राहते. या सगळ्याकडे एकत्रितपणे पाहण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांनी आधीच इशारा दिला आहे. 2022 च्या संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, हिमालयातील एक तृतीयांश हिमनद्याला ‘ग्लोबल वार्मिंग’चा धोका आहे. वाढत्या तापमानामुळे 2000 पासून हिमनदी वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्लेशियर्स दरवर्षी 58 अब्ज टन बर्फ गमावत आहेत. हे फ्रान्स आणि स्पेनच्या एकूण पाण्याच्या वापराच्या बरोबरीचे आहे. ‘द इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट’ च्या मते हिंदुकुश हिमालयीन प्रदेशात तापमान वाढीचा दर जागतिक दरापेक्षा खूप जास्त आहे. 2023-24 च्या हिवाळ्यात संपूर्ण प्रदेशात विक्रमी कमी हिमवृष्टी झाली. विशेषत: पश्चिम हिमालयात फार कमी हिमवर्षाव झाला. 2023 च्या भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी मॉन्सूननंतर उत्तराखंडमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तापमानात दोन अंशांपेक्षा जास्त बदल झाला होता. याशिवाय हिवाळ्यानंतर पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. या वर्षी उत्तराखंडच्या मैदानी आणि डोंगराळ भागात भीषण उष्मा होता. डेहराडूनमध्ये तापमान 44 अंशांवर पोहोचले आहे. ग्लेशियोलॉजिस्ट डॉ.अनिल देशमुख यांच्या मते, देशाच्या इतर भागांच्या तुलनेत हिमालयात तापमान अधिक वेगाने वाढत आहे. याला एलिव्हेटेड इफेक्ट म्हणतात. जसजशी उंची वाढते तसतसे तापमानही वाढते. त्यामुळे, हंगामी बर्फ आता उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात आणि वसंत ऋतूमध्ये वेगाने वितळत आहे. ओम पर्वतावरील बर्फ गायब होणे हा त्याचा पुरावा आहे. डोंगराळ प्रदेशात होत असलेल्या बदलांचे हे प्रतीक आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांच्या मूल्यांकनावरून असे दिसून येते, की बर्फवृष्टीचे प्रमाण कमी होत आहे आणि पावसाचे प्रमाण वाढत आहे. कमी बर्फ आणि वाढत्या तापमानामुळे हिमनद्या वितळत आहेत.’ गढवाल विद्यापीठाचे प्राध्यापक आणि हिमनदी शास्त्रज्ञ एचसी नैनवाल यांनी सांगितले, की हवामानातील बदल आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे हिमवर्षाव कमी होत आहे. त्यामुळे हिमालयातील हिमनद्यांवरही त्याचा परिणाम होत आहे. हिमनद्यांमध्ये बर्फ साचू शकत नाही, हे भविष्यातील जलसंकटाचे लक्षण आहे. हिमालयीन प्रदेश हिमवर्षाव नसलेले दिसतात. नैनवाल म्हणतात, की हिमवर्षाव नसणे ही चिंतेची बाब आहे; परंतु त्याहून धक्कादायक बाब म्हणजे हिमनदीतील रात्रीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे बर्फवृष्टी झाली तरी बर्फ वेगाने वितळत आहे. बर्फ गोठवणे अधिक महत्त्वाचे आहे. ग्लेशियरमध्ये बर्फ गोठत नसेल तर हिमनदीचे वस्तुमान संतुलन ऋणात्मक होते. वस्तुमान शिल्लक म्हणजे वर्षापेक्षा जास्त बर्फ वितळत आहे, ही चिंतेची बाब आहे. रात्रीच्या वेळी हिमनदीचे तापमान हवे तितके थंड नसते. त्यामुळे हिमनद्याही मागे सरकत आहेत. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत हिमनदीमध्ये सर्वाधिक बर्फ पडतो. मे ते ऑक्टोबर या काळात बर्फ वितळतो. जेव्हा पृथ्वी तापमानवाढीच्या अवस्थेत असते, तेव्हा हिमनद्या मागे सरकतात. म्हणजे त्यांची घनता आणि जाडी कमी होते.
(अद्वैत फीचर्स)