– सत्तरी गाठलेल्या ‘मुली मुलां’चा उत्साह कौतुकास्पद

ठाणे, दि. (प्रतिनिधी)

: अंबरनाथ येथील दि एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय येथे १९७२ साली अकरावी (जुनी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी समाज माध्यमाद्वारे एकत्र येऊन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात सुमारे सहा शाळांना भेट दिली आणि तेथील मुली, मुले आणि शिक्षक तसेच शाळांना घसघशीत सहाय्य केले. सत्तरी ओलांडलेल्या या विद्यार्थ्यांच्या विधायक कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. समाज माध्यमावर ‘आम्ही १९७२चे विद्यार्थी’ असा समूह काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. या माध्यमातून १९७२ साली जुनी अकरावी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५४ मुली आणि मुलांनी (आज मितीस सत्तरीत असलेल्या) एकत्र येऊन काही विधायक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अंदाड येथे भेट दिली. ‌विशेष म्हणजे दि एज्युकेशन सोसायटीच्या अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय या शाळेचीच शाखा अंदाड येथे असून सौ. दीपिका विशे या मुख्याध्यापिका आहेत.   त्यानंतर अंदाड येथे प्रवीण शिर्के मुख्याध्यापक असलेल्या  शाळेला भेट दिली. यानंतर  हीव, सपाटपाडा, मानिचा पाडा येथील शाळांना भेटी दिल्या. या ठिकाणी मडके, कुंदे, चौधरी, हुलावळे, पाटील असे शिक्षक आदिवासी मुले मुलींना आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पाटी, पेन्सिल, कंपॉस, वह्या, चित्रकला वह्या, रंग, खोडरबर, शाळेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू, सतरंजी पट्ट्या, रोख रक्कम अशाप्रकारे सहाय्य करण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षक, कर्मचारी, गणवेशातील मुली, मुले यांनी अतीशय शिस्तबद्ध पद्धतीने या सत्तरीतल्या मुली मुलांचे प्रेमादराने स्वागत केले. रमेश कुर्जेकर, भारती सातघरे, भारती चव्हाण, ज्योती तावडे, सिद्धार्थ पुराणिक, सरोजिनी राणे, नीलांबरी गुप्ते, प्रतिभा धर्माधिकारी, प्रकाश मावळणकर, रत्नाकर कोर्डे, अनघा पोतनीस, संजीव पोतनीस, विजय औटी, दिगंबर वेर्णेकर यांचा या १९७२ च्या तुकडीत समावेश होता. भारती सातघरे, रत्नाकर कोरडे, सिद्धार्थ पुराणिक यांनी या तुकडीचे नेतृत्व करतांना मुंबईहून सर्व शालोपयोगी साहित्य आणण्यासाठी परिश्रम घेतले. उद्योजक (व विद्यार्थी) विश्वनाथ पनवेलकर यांनी ही सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *