रायगडातील २६६ शाळांमध्ये ४ हजार ५७८ जागा उपलब्ध
अशोक गायकवाड
अलिबाग : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेला मंगळवार १४ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. राज्यभरातील १ लाख ८ हजारांपेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील २६६ शाळांचा समावेश असून चार हजार ५७८ जागा उपलब्ध आहेत. १४ ते २७ जानेवारी या कालावधीत जास्तीत जास्त पालकांनी ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनीता गुरव यांनी केले आहे.
विशेष म्हणजे खोटी, चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला आणि ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी, चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी या बाबींचा विचार करुनच अर्ज भरणे गरजेचे आहे. याकडेही पुनीता गुरव यांनी लक्ष वेधले.आरटीई पोर्टलवरील आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यातील २६६ शाळांचा समावेश असून चार हजार ५७८ जागा उपलब्ध आहेत. राज्यभरातील ८ हजार ८४९ शाळांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी एकूण १ लाख ८ हजार ९६१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुणे जिल्ह्यात उपलब्ध असतात. यंदाही पुणे जिल्ह्यातील ९५१ शाळांची नोंदणी झाली आहे. त्यात १८ हजार ४५१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. निवासी पुरावा, जन्म तारखेचा पुरावा, जातीचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला यासारखे कागदपत्र आरटीई प्रवेशासाठी महत्वाचे आहेत. पालकांनी ऑनलाइन अर्ज करताना अचूक माहिती भरावी अशी सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal या लिंकवर विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येणार आहेत.
