Month: January 2025

परेश ठाकूर यांच्यामुळे मच्छी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध होणार

अशोक गायकवाड पनवेल : पनवेल महापालिकेच्यावतीने नवीन पनवेल मधील गणेश मार्केट जवळील भुखंडावर तात्पुरत्या स्वरूपात मच्छी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी या ठिकाणची अधिकाऱ्यांसह पाहणी करुन सूचना दिल्या. नवीन पनवेल शिवा कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या बस डेपोजवळील भुखंड हा मच्छी मार्केट साठी राखीव असून मच्छी मार्केट उभारण्यात येणार आहे. तो पर्यंत मच्छी विक्रेत्यांना या ठिकाणी व्यवसाय करता यावा यासाठी तात्पुरत्या स्वरुपात या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. या ठिकाणची पनवेल महापालिकेचे माजी सभागृनेते परेश ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजश्री वावेकर, महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर उपस्थित होते. ००००

कामगार कार्यकर्ते संदीप परब हे मुंबई पोर्टच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील शेड सुप्रीटेंडंट व  सामाजिक  कामगार कार्यकर्ते  संदीप चंद्रकांत परब हे मुंबई पोर्टच्या ३७  वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निष्कलंकपणे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने   इंदिरा गोदीतील हमालेज बिल्डिंग येथे ३१  डिसेंबर २०२४  रोजी  मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे  वरिष्ठ सहाय्यक गोदी प्रबंधक  हंसराज सावंत यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सोबत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष व मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर  प्रदीप नलावडे, युनियनचे सेक्रेटरी आणि  माजी बोर्ड मेंबर  दत्ता खेसे, युनियनचे सेक्रेटरी  विजय रणदिवे, युनियनचे  प्रसिद्धी प्रमुख  मारुती विश्वासराव असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर गणेश जाधव आणि अदाते उपस्थित होते.

ठाण्यातील वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणारे आरएमसी प्लांट बंद करा – महेशसिंग ठाकूर

अनिल ठाणेकर ठाणे : वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ठाणे शहरातील घोडबंदर महामार्गाच्या गायमुख परिसरासह इतर ठिकाणी असलेले आरएमसी प्लांट त्वरित बंद करण्यात यावेत, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे. गेल्या काही कालावधीपासून ठाणे शहरातील वातावरण प्रदूषित झालेले असून, शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मेट्रो प्रकल्प आणि ठिकठिकाणी सुरु असलेली निवासी प्रकल्पांची बांधकामे, यामुळे ठाण्याची हवा दुषित होऊन, हवेचा स्तर पूर्णपणे घसरलेला दिसून येत आहे. परिणामी, खोकला आणि दम्याच्या आजारात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. मुंबईचे धाकटे भावंडं, अशी ठाणे शहराची ओळख गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली असतानाच, ठाण्याचे नागरीकीकरणही तेवढ्याच प्रचंड प्रमाणात झालेले आहे. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या ही, वाढत्या वाहतूक कोंडीलादेखील कारणीभूत ठरत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, आधीच वायुप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषणामुळे ठाणेकर नागरिक त्रासलेले असतानाच, सध्या ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे, एकेकाळी “तलावांचे शहर” अशी ओळख असणाऱ्या ठाण्याची ओळख आता, ‘प्रदूषित शहर’ अशी निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत ठाणे शहरातील हवेचा दर्जा पूर्णपणे घसरलेला असल्याचे, प्रसिद्धीमाध्यमांतील बातम्यांच्या माध्यमातून स्पष्ट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत, घोडबंदर महामार्गालगत अनेक निवासी संकुले उभी राहिली आहेत आणि आजही मोठमोठ्या निवासी संकुलांची/प्रकल्पांची बांधकामे सुरु आहेत. वाघबीळ परिसरातील हिरानंदानी-मेडोज याठिकाणी, गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या प्रकल्पाचे खोदकाम सुरु असून, अनेक जेसीबी मशिन्सच्या माध्यमातून हे काम दिवस-रात्र सुरु असते. या खोदकामामुळे मोठ्याप्रमाणात धुरळा उडून, परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. असे असतानाही, ठाणे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतीही दाखल घेतली जात नाही. याच अनुषंगाने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव-सदस्य अविनाश ढाकणे आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठविण्यात आले असून, वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ठाणे शहरातील बांधकाम प्रकल्पांवर बंदी आणण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबईच्या हवेचा स्तर वाईट झालेला असल्याकारणाने, तसेच बोरीवली पूर्व आणि भायखळा या परिसरांतील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत गेल्याने, तेथील सर्व बांधकामे बंद करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. ज्या विभागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २००च्या वर जाईल, त्या विभागातील सर्वच बांधकामे बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांद्वारे स्पष्ट झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर, ठाणे शहरातील वायुप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या किंवा ठरु पाहणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर निर्बंध लादण्यात यावेत. बांधकामांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी, सविस्तर मार्गदर्शक सुचना तयार करण्यात याव्यात, त्याचप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी नियमावलीचे योग्य पालन न झाल्यास, सरसकट सर्वच बांधकामे बंद करण्याचा कठोर निर्णय घेण्यात यावा. तसेच, ठाणे शहरातील घोडबंदर महामार्गाच्या गायमुख परिसरासह, इतर ठिकाणी असलेले आरएमसी प्लांट त्वरित बंद करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महेशसिंग ठाकूर यांनी अविनाश ढाकणे आणि सौरव राव यांच्याकडे केली आहे. ०००००

 नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत

 नेरुळ विभागात पाडकामाची कारवाई   नवी मुंबई:  उच्च न्यायालयाचे वेळोवेळी आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे अतिरिक्त आयुक्त (2) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने नेरुळ विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत 1) श्री. श्रीमंत हजारे, एन.एल.-1 बी-16/15, से.10, नेरूळ, नवी मुंबई, 2) श्री. गंगाराम देशमुख, एन.एल.1 ए-6/4, से.10, नेरूळ, नवी मुंबई, यांचे सदर ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली असता अंदाजे 3.50मी X 7.20मी मोजमापाचे G+4 आर. सी. सी. बांधकाम अनधिकृतरित्या करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर अनधिकृत बांधकामधारकाला अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नेरुळ विभाग कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये दि.10/12/2024 रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. तथापि, नोटीसीची मुदत संपुष्टात येऊनही अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविण्यात आले नाही. सदर कारवाई  सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. जयंत जावडेकर व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, 10 मजूर, 2 गॅस कटर, 6 ब्रेकर च्या सहाय्याने अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक यांच्या मार्फत करण्यात आली आहे. यापुढे देखील अशाप्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

ठाण्यातील ३९ बांधकाम व्यावसायिकांना बजावली कारणे दाखवा नोटीस

हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे पालन न केल्यास महापालिका देणार काम थांबवण्याचे आदेश ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार, महापालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण २९७ बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या ३९ बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी नियमावलीचे तत्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम थांबण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करण्याबाबत २९७ बांधकामांना प्राथमिक नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यापैकी, ३१ जणांनी सर्व नियमावलीचे पालन केले आहे. तर, १५१ जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले आहे. तर, ३९ जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांकडून तातडीने पूर्तता न झाल्यास तत्काळ काम थांबवण्याचे आदेश काढावेत, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी दिले आहेत. तसेच, सर्व २९७ बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांचा आढावा बुधवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी घेतला. या आढावा बैठकीस, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त पद्मश्री बैनाडे, उपायुक्त सचिन सांगळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह महापालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, मेट्रो, एमएसआरडीसी, परिवहन विभाग, पोलीस आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हवा प्रदूषणाचा परिणाम सगळ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी महापालिकेच्या समन्वयाने मा. उच्च न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे, असे माळवी यांनी स्पष्ट केले. मेट्रो आणि एमएसआरडीसी यांनीही कामे करताना हरित जाळी लावून धूळ नियंत्रण करावे, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत, हवा प्रदूषणाबाबत महापालिकेकडे प्राप्त झालेल्या विविध तक्रारींबाबत पर्यावरण विभागाने १,७०,००० रुपये दंडाची कारवाई केली असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, ठाण्यातील विकासकांद्वारे त्यांच्या प्रकल्पात, ५० ठिकाणी हवा प्रदूषण मोजणीचे यंत्र बसविण्यात आले आहे. त्याची सातत्याने पाहणी पर्यावरण विभागामार्फत केली जात आहे. इतर व्यावसायिकांनीही ही यंत्रणा ताबडतोब बसवावी. त्याबाबत हयगय झाल्यास कारवाई करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केले. पालापाचोळा जाळणाऱ्यांवर कारवाई ठाणे महापालिका क्षेत्रात उघड्यावर पालापाचोळा, कचरा, प्लास्टिक जाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याची काटेकोर अमलबजावणी करण्यात येत आहे. आतापर्यंत त्याबाबतच्या ०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे पाहणी करून २० हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.  तसेच, हॉटेल्स, तंदूर, रेस्टॉरंट, बेकरी येथे जळाऊ लाकूड वापरण्याबाबत बंदी घालण्यात आली आहे. तोडफोड कचऱ्याची विल्हेवाट ठाणे महापालिकेचा बांधकाम व तोडफोड कचरा विल्हेवाट प्रकल्प ३०० टन क्षमतेचा आहे. या प्रकल्पात मार्च २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या काळात ७४१४ टन तोडफोड कचऱ्याचे संकलन आणि पुनर्वापर करण्यात आले आहे. त्याचबरोबर, सर्व बांधकाम विकासक आणि ठेकेदार यांनी जीपीएस यंत्रणा असलेल्या वाहनांमधूनच डेब्रिज वाहतूक करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ५९०९ वाहनांवर कारवाई ठाणे महापालिकेतर्फे प्रादेशिक परिवहन विभागाशी समन्वय साधून आनंद नगर चेक नाका व दहिसर चेक नाका येथे डेब्रिज वाहतूक करणाऱ्या व ताडपत्री नसलेल्या एकूण ५९०९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पीयूसी नसलेल्या ४००८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. डेब्रिजची विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या स्थळाचा वाहतूक पास असल्याशिवाय अशा वाहनांना ठाणे महापालिका हद्दीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक व इमेल हवा प्रजूषण नियंत्रणाबदद्लच्या तक्रारी करण्यासाठी ८६५७८८७१०१ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर, pcctmc.ho@gmail.com या इमेलवरही तक्रार नोंदवता येईल.

महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातील आदर्श पोलीस दल असल्याचे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन…

कोट्यावधीचे इनाम असलेल्या नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोलीतील विविध उपक्रमात व्यस्त होते. फडणवीस यांच्या उपस्थितीत कोट्यावधीचे इनाम असलेल्या कमांडकर तारक्कासह ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यावेळी फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत…

‘एकनाथ हिरक आरोग्यवर्षा’साठी शिवसेना वैद्यकीय कक्ष सज्ज

सिध्देश शिगवण ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘शिवसेना वैद्यकीय मदत’ कक्षाच्या वतीने हे संपूर्ण वर्षे ‘एकनाथ हिरक आरोग्यवर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. परंपरेनुसा ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री एकनाथ शिंदे यांनी…

गोगावलेंच्या एसटी भ्रष्ट्राचाराला फडणवीसांनी दिला नववर्षात ब्रेक !

स्वाती घोसाळकर  वाढीव दराने काढले होते टेंडर० दोन हजार कोटींचा बसणार होता फटका०  भरत गोगावलेंनी आचारसंहीतेपुर्वी घेतला होता घाईघाईत निर्णय   मुंबई : ना खाऊंगा ना खाणे दुंगा या पंतप्रधान…