ठाणे : महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या अस्थापानेत कार्यरत आहेत, तिथेच त्यांना नियमित करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, याचीच आठवण करून देण्यासाठी आणि इतर मागण्यांकडे देवेंद्र फडणवीस सरकारचे लक्ष वेधण्याकरिता माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ४, फेब्रुवारी रोजी दुपारी १२.००वाजता आझाद मैदान, मुंबई येथे या युवक युवतींचे वादळ धडकणार आहे.
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणार्थी संधी उपलब्ध करून दिली होती, विविध शासकीय विभागात हे सर्व युवक कार्यरत असून, आपले कर्तव्य आणि जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे पार पाडत आहेत, दरम्यान सर्व युवकांना शासकीय कामाचा अनुभव आणि मार्गदर्शन उत्तम प्रकारे मिळत असल्याचे युवकांचे म्हणणे आहे परंतु या प्रशिक्षणार्थीचा कालावधी हा सहा महिन्याचा असल्याकारणाने येत्या फेब्रुवारी २०२५, मध्ये हा कालावधी पूर्ण होणार आहे, त्यानंतर हे सर्व युवक बेरोजगार होणार असल्याची भीती या युवकांमध्ये आहे. त्यामुळेच आपल्या रोजगाराची संधी हिरावून घेऊ नये, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.. या मोर्चामध्ये महाराष्ट्रभरातून हजारो युवक सहभागी होणार असल्याचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी एका पत्रकात म्हटले आहे, दरम्यान, मागील महिन्यात हजारोच्या संख्येने हे युवक-युवतीनी आझाद मैदान येथे आपल्या मागण्या संदर्भात एकदिवसीय निदर्शने करून शासनाला निवेदन सादर केले होते, परंतु शासनाने त्यावर कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे आज पुन्हा एकदा आम्हाला आझाद मैदान येथे एकत्र येऊन शासनाला आठवण करून देण्याची वेळ आली आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.