उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारणे हा लोकशाहीचा अपमान -ॲड. विक्की पाटील
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारला गेला. हा एकप्रकारे लोकशाही व्यवस्थेचा अपमान आहे.असा आरोप अपक्ष उमेदवार ॲड. विक्की पाटील यांनी रविवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना केला.याविरोधात आम्ही जनहीत याचिका दाखल करण्याचा विचार सुरु केला आहे. अशी माहिती ॲड. विक्की पाटील यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ (अ) मधून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या ऍड.विक्की पाटील यांनी १० हजारहून अधिक मत घेतली होती.यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला. याबाबत सविस्तर बोलण्यासाठी विक्की पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली होती.यावेळी बोलतांना विक्की पाटील म्हणाले की २०१० पासून मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सातत्याने शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची काम करत होतो.पण यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती झाली. परिणामी प्रभाग क्रमांक ४ (अ )येथे मी इच्छुक असताना जागावाटपात ती जागा भाजपाच्या वाट्याला गेली. मात्र जनसेवेचा वसा मी घेतला असल्याने नागरिकांच्या सेवेकरिता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उमेदवारी दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. माझ्याकडे प्रचारासाठी खूप कमी अवधी होता. त्यातही माझ्यामागे पक्षाचे कोणतेही पाठबळ नव्हते. तरीही मी सुरुवातीपासून दारोदारी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला. मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ही मला प्रचारादरम्यान मिळत होता.माझ्या मतदारसंघात अनेक उच्चभ्रू सोसायटी ही येतात. पण या निवडणुकीत माझ्या मतदार संघातील अनेक उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेशच नाकारला जात होता. या येथे अनेक उमेदवारांना मतदारापर्यंत पोहचूच दिले गेले नाही.याचा अनुभव मी माझ्या प्रचाराच्यावेळी स्वतः त घेतला आहे. आम्हाला प्रचारादरम्यान सोसायटीच्या प्रवेशद्वारावर रोखले जात होते. हा एक प्रकारे लोकशाहीचा अपमान आहे.असा आरोप विक्की पाटील यांनी यावेळी बोलतांना केला.ही पद्धत लोकशाहीला घातक अशी आहे. हे रोखण्यासाठी यासंदर्भात लवकरच आपण एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्याचा विचार सुरू केला आहे. अशी माहिती ऍड.विक्की पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली.तसेच माझा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी यापुढे मी एस. के. पाटील या माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहे. असे ही विक्की पाटील यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.
