अवघे राज्य शोकसागरात
अवघ्या राज्याच्या राजकारणाला नखशिखांत हादरवून टाकणारी बातमी अजितदादांच्या अकाली निधनाच्या निमित्ताने आली. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव साडेतीन दशके सातत्याने चर्चेत राहिले. लोकसभेची अल्पकालीन कारकीर्द वगळता ते बारामती मतदारसंघातून सलग निवडून आले. विकासाची दूरदृष्टी, परखड, स्पष्टवक्ता, प्रशासनावर पकड आणि राज्याच्या प्रश्नांची जाण असलेल्या अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले. बारामतीचा विकास पाहता आमदार कसा असावा, याचे ते ज्वलंत उदाहरण होते. अजित पवार यांचे नेतृत्व हे करिष्म्यापेक्षा नियंत्रणावर आधारित होते. ते भावनिक भाषणांपेक्षा आकडेवारी, योजना आणि निधी यांवर अधिक भर देत. अधिकारी वर्गावर पकड ठेवणे, निर्णयांची अंमलबजावणी करून घेणे आणि विरोधाला थेट सामोरे जाणे ही त्यांची शैली होती. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्लक्ष करता न येणारे व्यक्तिमत्त्व आहे. घेतलेले निर्णय, उचललेली पावले आणि निर्माण केलेले वाद यामुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांच्या समकालीन राजकारणाची चर्चा अपूर्ण आहे. स्पष्टवक्तेपणा, कठोर प्रशासकीय भूमिका आणि आक्रमक राजकारण यासाठी ओळखले जाणारे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा जबाबदारी सांभाळली. वित्त खाते, नियोजन विभाग यासारखी महत्त्वाची खाती त्यांनी हाताळली. अर्थसंकल्पीय बाबींवरील प्रभुत्व आणि आकडेवारीवरील पकड यामुळे ते एक कुशल प्रशासक म्हणून ओळखले जात. त्यांची कार्यशैली अत्यंत शिस्तप्रिय आणि कधी कधी कठोर मानली जाते. कामात दिरंगाई किंवा हलगर्जीपणा त्यांना सहन व्हायचा नाही. अधिकाऱ्यांना थेट सूचना देणे, वेळेवर निर्णय घेणे आणि कामाचा पाठपुरावा करणे हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. पहाटे सहा वाजताच फील्डवर उपस्थित राहणारा आणि वेळ पाळणारा नेता अशी त्यांची ओळख होती. हे दोन्ही गुण पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे.
पाणी व्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्र हे अजित पवार यांच्या राजकारणातील महत्त्वाचे विषय राहिले. दुष्काळी भागासाठी पाणी उपलब्ध करून देणे, कालवे, धरणे आणि सिंचन प्रकल्प राबवणे यावर त्यांनी विशेष भर दिला. काही प्रकल्पांवरून त्यांच्यावर टीकाही झाली, चौकशी झाली; मात्र त्यांनी नेहमीच आपण घेतलेले निर्णय विकासासाठीच होते, अशी भूमिका मांडली. अजित पवार यांच्या वाट्याला राजकारणातील चढउतार मोठ्या प्रमाणात आले. पक्षांतर्गत मतभेद, सत्तास्थापनेदरम्यान घेतलेले धक्कादायक निर्णय तसेच राजकीय भूमिका बदल यामुळे ते कायम चर्चेत राहिले. त्यांच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेकदा अनपेक्षित वळण मिळाले. अजित पवार यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा थेट संवाद. ते लोकसभा, विधानसभेत किंवा सार्वजनिक सभांमध्ये मुद्देसूद आणि थेट भाषेत बोलत. अलंकारिक भाषेपेक्षा वास्तववादी आणि कधी कधी बोचऱ्या शब्दांचा वापर ही त्यांची खरी ओळख. ग्रामीण भागातील जनतेला ही शैली आपलीशी वाटते. सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत अजित पवार यांचा दृष्टिकोन प्रामुख्याने व्यवहार्य राहिला. मोठ्या घोषणा करण्यापेक्षा उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, अर्थसंकल्पीय शिस्त आणि परिणामकारक अंमलबजावणी यावर ते भर देत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर शरद पवार यांच्या राजकीय शिस्तीचा आणि दूरदृष्टीचा प्रभाव होता; मात्र अजित पवार यांनी स्वतःची स्वतंत्र, आक्रमक आणि कधी कधी बंडखोर अशी प्रतिमा निर्माण केली.
सत्तेत असो वा विरोधात; अजितदादांची भूमिका नेहमीच प्रभावी राहिली. अजित पवार हे कार्यक्षम, आणि परंपरागत राजकारणापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारणारे नेते होते. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता, कठोर प्रशासकीय भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे अजित पवार यांची ओळख एक कठोर प्रशासक नेता अशी निर्माण झाली. ते केवळ राजकारणी नसून एक कार्यक्षम प्रशासक म्हणूनही ओळखले गेले. त्यांच्या नेतृत्वशैलीवर समर्थक आणि टीकाकार अशा दोन्ही बाजूंनी चर्चा होत असे; मात्र त्यांच्या कार्यशैलीत असलेली ठामपणा आणि परिणामकारकता नाकारता येत नाही. बारामती तालुक्यातून राजकारणाची सुरुवात करत त्यांनी हळूहळू राज्यस्तरीय नेतृत्वापर्यंत मजल मारली. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी अनेक वेळा समर्थपणे सांभाळल्या. त्यांची सर्वात ठळक ओळख म्हणजे कठोर आणि शिस्तप्रिय प्रशासकीय शैली. कामात दिरंगाई, निष्काळजीपणा किंवा अकार्यक्षमता त्यांना मान्य नसायचा. अधिकारी वर्गाला थेट प्रश्न विचारणे, वेळेची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि निकालाभिमुख प्रशासन यावर त्यांचा भर असायचा. अनेक वेळा त्यांच्या भाषेतील रोखठोकपणा चर्चेचा विषय ठरायचा; मात्र काम लवकर आणि प्रभावीपणे पूर्ण व्हावे, हाच त्यामागील उद्देश असायचा.
अजितदादांचा प्रशासकीय कठोरपणा विकासाशी जोडलेला होता. सिंचन, पाणीपुरवठा, शेती, पायाभूत सुविधा आणि अर्थकारण या क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जलसंपदा मंत्री असताना त्यांनी अनेक सिंचन प्रकल्पांना गती दिली. अवघड परिस्थितीतही निर्णय घेण्याची त्यांची तयारी असायची. काही निर्णय वादग्रस्त ठरले, तरी ते निर्णय घेण्यापासून मागे हटले नाहीत. त्यांनी राज्याच्या आर्थिक नियोजनात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प मांडताना वास्तववादी आकडे, विकासावर भर आणि वित्तीय शिस्त यांचा समतोल साधण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसून आला. खर्चावर नियंत्रण, योजनांची अंमलबजावणी आणि निधीचा योग्य वापर याबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतली. अजितदादांची कठोर शैली ही त्यांच्यासाठी ताकद असली, तरी तीच बाब अनेकदा टीकेचे कारणही ठरली. त्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले. काही वेळा अधिकारी, विरोधक किंवा प्रसारमाध्यमांवर केलेल्या टिप्पण्यांमुळे त्यांच्यावर टीका झाली; मात्र त्यांच्या शब्दांपेक्षा काम अधिक महत्त्वाचे ठरले. कठोर प्रशासक असूनही अजितदादांनी जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. दौरे, आढावा बैठक, प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी यामुळे ते जमिनीवरील वास्तव जाणून घेत. राज्याच्या प्रशासनात गती, शिस्त आणि विकासाचा दृष्टिकोन रुजवण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. राज्यातील जनता नेहमीच त्यांना आठवणींमध्ये जपणार आहे.
(अद्वैत फीचर्स)
