स्वाती घोसाळकर
मुंबई – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी करावे यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
अजितदादांच्या अकाली जाण्याने उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. राष्ट्रवादीत छगन भुजबळ हे माजी उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर सुनील तटकरे, आणि प्रफुल पटेल हे दिग्गज नेते आहेत. पण या तिघांना पक्षात सर्वमान्यता मिळणे शक्य नसल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी खासदारकीचा राजीनामा देऊन बारामतीतून आमदारकीची लढत लढवावी आणि उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाची धुरा सांभळावी असा मत प्रवाह आहे. अजित पवारांचा मोठा मुलगा पार्थ पवारवर पुणे जमीन प्रकरणातील घोटाळ्याचे आरोप असल्याने त्यांचे नाव मागे पडले आहे.
पक्ष एकीकरणात शरद पवार यांची राजकीय भुमिका आड येत आहे. भाजपासोबत जायचे नाही ही शरद पवारांची भुमिका असल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारी पक्षाच्या एकीकरणाच्या नावाखाली सत्तेशिवाय राहू शकणार नाहीत. त्यामुळ एकीकरणाची चर्चा सुरू असली तरी त्याला वेग मिळालेला नाही अशी सुत्रांची माहीती आहे. त्यात १७ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हाची सुनावणी असून त्यावेळी जर विलनीकरणाचाच फक्त पर्याय सुप्रीम कोर्टाने ठेवल्यास भाजप किंवा शरद पवारांच्या पक्षात त्यांना विलीन व्हावे लागेल. म्हणूनच सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत सुनेत्रा पवारांनी पक्षाची सुत्रे हाथी घ्यावी असाही एक मतप्रवाह आहे.
त्यात देवेंद्र फडणवीस यांची अजित पवारांसोबत असलेली मैत्री पाहता सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाला फडणवीस यांच्याकडूनही पाठींबा मिळेल असे सुत्रांचे म्हणणे आहे.
सुनेत्रा पवार या माजी मंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. १९८५ साली त्यांचा विवाह अजितदादांशी झाला. त्यांना पार्थ पवार आणि जय पवार असे दोन पुत्र आहेत. लोकसभा निवडणूकीत त्याचा पराभव झाल्यानंतर १८ जून २०२४ मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झालेली आहे.
