मध्य रेल्वेचा नियोजन शून्य कारभार
आसनगाव उड्डाणपुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
ठाणे: शहापूर तालुका येथील गर्दीचे एकमेव स्थानक म्हणून आसनगाव रेल्वे स्थानक ओळखले जाते.दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात.मात्र,रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका स्थानिक नागरिक व प्रवाशांना बसत आहे. स्थानक परिसरातील एकमेव जुने फाटक रेल्वेने संरक्षक भिंत उभारून बंद केल्यामुळे हजारो नागरिक आणि प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत.त्यामुळे तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा,अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
आसनगाव परिसराचा झपाट्याने विकास होत असून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.मात्र, पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा रेल्वेवरील उड्डाणपूल नसल्यामुळे अनेकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.सुरक्षित व सोयीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली असली तरी रेल्वे प्रशासनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
उड्डाणपूल नसल्यामुळे स्थानिक वाहनचालक आणि चाकरमानी प्रवाशांना तब्बल तीन ते चार किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.हनुमान मंदिराजवळील रस्ताही रेल्वेने बंद केल्याने शिवाजी चौकातील बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली असून अनेकांचा रोजगार धोक्यात आला आहे.
जुने फाटक बंद केल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या नागरिकांना एक ते दीड  किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.शिवाय उंच स्थानकावरील जिने चढताना महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी यासंदर्भात अनेकदा निवेदने दिली असून माजी खासदार कपिल पाटील यांनीही रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र,अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे स्थानिकांमध्ये रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त होत असून लवकरच जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया :
“आसनगाव फाटकातून गेली अनेक वर्षे आम्ही पश्चिमेकडून पूर्वेला जात होतो. विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी आणि वृद्धांसाठी हा मार्ग सोयीचा होता.पण आता संरक्षक भिंत उभारून सर्व रस्ते बंद केल्यामुळे आम्हाला मोठा फेरा मारावा लागतो.या समस्येमुळे आम्ही खूप त्रस्त आहोत.
– संजय उमवणे, स्थानिक नागरिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *