ठाणे – बोरीवली भुयारी मार्ग
मातीच्या विल्हेवाटीसाठी डेडीकेट कॉरिडॉरचा आग्रह
न जुमानणाऱ्या विकासकांवर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा रहिवाश्यांचा इशारा
अनिल ठाणेकर
ठाणे-ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाईदरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवर स्थानिक रहिवाशी आणि विकासामध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत.मातीची विल्हेवाट लावण्यासाठी एमएमआरडीएने कन्व्हेयर बेल्टचा प्रस्ताव दिला मात्र ९० टक्के रहिवाश्यांची डेडीकेटेड कॉरीडॉरला (विशेष वाहतुक मार्गिका) सहमती आहे. या प्रकल्पाच्या मध्ये जी जागा आहे तेथुन मातीचे डंपर पास होणार असल्याने वाहतुकीचाही प्रश्न उदभणार नाही. असा दावा मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन रहिवाश्यांनी केला. तसेच, महापालिकेने नोटीस बजावूनही काही विकासक जुमानत नसल्याने त्यांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही या रहिवाश्यांनी दिला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत ठाणे ते बोरिवली या महत्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पाची उभारणी ठाण्यातील मुल्ला बाग परिसरात सुरू आहे. सुमारे १८,८३८ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या भुयारी मार्ग खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून सध्या स्थानिक रहिवाशी आणि तेथील विकासकामध्ये जुंपली आहे. दररोज ३५० डम्पर माती वाहतूक करणार असल्याने परिसरात हवा प्रदुषणात वाढ होण्याची भीती व्यक्त करत त्यास रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक २५० पर्यंत जातो. त्यामुळे प्रदुषणाचा त्रास वाढत असुन अनेकांना आजार बळावत आहत. व्हेराटॉन, निलकंठ ग्रीन्स, सत्य शंकर हे विकासकांना कन्व्हेयर बेल्ट हवा आहे. मात्र, डेडीकेडेट कॉरिडॉरला ९० टक्के रहिवाश्यांची सहमती आहे. सर्वप्रथम भुयारी मार्गाची टेल कंप्लीट करून टाकावी, तसेच, डेडीकेटेड कॉरिडॉरमधील जी जागा आहे तेथुन मातीचे डंपर पास होणार असल्याने वाहतुकीचा प्रश्नही उद्भवणार नसल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे आहे. याला ९० टक्के रहिवाश्यांची सहमती आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे लवकरच यासंदर्भात बैठक घेणार असल्याचेही रहिवाश्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी, शिवसेना नगरसेवक सिद्धार्थ पांडे, राकेश मोदी, आशुतोष शिरोळकर, निवृत्त अभियंता भिडे, धाने, मुजुमदार आणि शरद वास्कर आदी रहिवाशी उपस्थित होते.
