‘हिंद दि चादर’चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे प्रतिपादन

अशोक गायकवाड

पालघर : वाडा तालुक्यातील अंबिस्ते येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत “हिंद दी चादर” या संकल्पनेचा मूलभूत संदेश त्यांच्या मनात रुजवण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमात सुप्रसिद्ध सूफी गायक सतिंदर सरताज यांच्या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमास प्रांत अधिकारी प्रदीप चव्हाण, शिक्षण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. संवादातून विद्यार्थ्यांना विचारांची दिशा भक्तिगीतानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी, “गाण्याचा अर्थ कोणाला समजला का?” असा थेट प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षणाची संधी दिली. “प्रत्येक कृतीमागील अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. केवळ ऐकणे नव्हे, तर त्यातून मूल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शीख धर्माचे नववे गुरु गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. “हिंद दी चादर” म्हणजे हिंदू धर्माचे नव्हे, तर संपूर्ण हिंद — म्हणजेच भारतभूमीचे संरक्षण करणारे. हा संदेश धार्मिक सहिष्णुता, स्वातंत्र्य आणि मानवतेच्या मूल्यांना बळकटी देणारा आहे,” असे त्यांनी नमूद केले. धर्मनिरपेक्षतेचा संविधानिक संदेश “आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्म पाळण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. कोणालाही जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. गुरु तेग बहादूर यांनी याच मूल्यांसाठी बलिदान दिले,” असे सांगत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत अधिकारांची जाणीव करून दिली. गुरुद्वारातील सेवाभावाचा उल्लेख करत त्यांनी सेवा, नम्रता आणि स्वावलंबनाचे महत्त्व स्पष्ट केले. “समाजासाठी निस्वार्थ सेवा आणि स्वतःचे कार्य स्वतः करण्याची वृत्ती अंगीकारली तरच खऱ्या अर्थाने प्रगती साधता येईल,” असे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले. अंबिस्ते येथील आश्रमशाळेतील सकारात्मक शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि शिक्षकांचे प्रयत्न यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. “महापुरुषांचे आदर्श समोर ठेवून आपण जीवनात यशस्वी व्हावे,” अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *