मुंबई : आजचा प्रसंग माझ्यासाठी वेदना आहे, हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. समाजातील कोणत्याही घटकाला
वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं त्यावेळी त्या बोलत होत्या.
आपल्या सर्वांचे लाडके नेते अजित दादा यांच्या अकाली जाण्याच्या अपार दुःखातून आपण अजूनही सावरलो नाहीत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी झाली असून ती भरून निघण्यासारख नाही, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पहिलंच भाषण केलं. यावेळी, त्यांचा कंठ दाटला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार असून समाजातील कोणत्याही घटकाला मी वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन आपण पुढे जाणार असल्याचे स्पष्ट केले.
अजित दादांना आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहिल्याचे मी पाहिलं. त्यांच स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही, आपण सर्वजण ते पूर्ण करणार आहोत. समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही. सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष आहे, म्हणूनच काम करतच आहे. पुन्हा एकदा आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे. आता शहरात देखील पक्षाचा विस्तार करायचा आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांना पक्षबळकटीला प्रोत्साहन देणारं भाषण सुनेत्रा पवार यांनी केलं.
