एक गाव – एक होळी संकल्पनेची तपपूर्ती
ठाणे : चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणे यांच्या विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गावकीची होळी होळीच्या एक दिवस आधी रविवार, १ मार्चला विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. सुमारे ८४ वर्षापूर्वी खंडीत झालेली ही परंपरा २०१५ साली जमात ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत नाखवा यांनी सुरु केली. यंदा या उत्सवाचे १२ वे वर्ष होते, त्यामुळे एक गाव एक होळी या संकल्पनेची तपपूर्ती मोठ्या उत्साहात साजरी केली.
सुरुवातीला परंपरेनुसार होळी मातेच्या अग्रपूजेचा मान नवदांपत्याला देण्यात आला. त्यानुसार जमात ट्रस्टचे विश्वस्त जमीर कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री प्रियंका विहंग कोळी, प्रांजल भावेश ठाणेकर, प्रभुती कैवल्य ठाणेकर, केतकी वैभव ठाणेकर, स्मिता रोहित कोळी, अमृता धीरज पाटील, अक्षता तन्मय कोळी, जागृती जित बारांगुळ, कोमल सन्मान कोळी या दांपत्यांनी होळी मातेची रितसर विधिवत पूजा केली. त्यानंतर कोळी गाण्यांच्या गजरात जमात ट्रस्टचे अध्यक्ष अमरेश ठाणेकर यांनी होळीला अग्नी दिला.
चेंदणी कोळीवाड्याचा १२ वा गावकीचा होलिकोत्सव यावर्षी पूर्व ठाण्यात कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिराच्या परिसरात साजरा करण्यात आला. याआधीचे सात पूर्वेत आणि पाच उत्सव पश्चिम भागात साजरे झाले. गावकीची ही परंपरा पुन्हा सुरु करण्यात जमात ट्रस्टचे माजी अध्यक्ष चंद्रकांत नाखवा यांनी विरोध सहन करून पुढाकार घेतला होता. यासंदर्भात चंद्रकांत नाखवा म्हणाले, चेंदणी कोळीवाड्यात एक गाव एक होळी ही परंपरा खूप आधी सुरु होती. पण ८५ वर्षापूर्वी ही परंपरा खंडित झाली. २०१५ साली जमात ट्रस्टचा अध्यक्ष असताना पुन्हा एक गाव एक होळी ही संकल्पना पुढे आली. मी आणि माझ्या कार्यकलरिणीतील सर्वच सदस्यांनी त्याला पाठिंबा देत सुरुवात केली. त्यावेळी काही लोकांनी त्यास विरोध केला, पण त्यांची समजूत घालण्यात आली. त्यावेळी हरियाली तलावाचा काही भाग सुकला जायचा. त्याठिकाणी होळी लावली जात असे. २०१५ साली हा उत्सव साजरा करताना गावकऱ्यांनी एक अट टाकली. होळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरासमोर लागणारी कुटुंबीयांची होळीही दारात लागणार. माझ्या कार्यकारीकरिणीसह सर्वांनी गावकीची ही अट मान्य केली. २०१५ साली गावाचा पाटील म्हणून मला होळी पेटवण्याचा मान देण्यात आला. पश्चिम विभागात होळी लावण्यासाठी लागणारा गाडा मी उपलब्ध करुन देतो. होळी मातेच्या अग्रपूजेचा मान नवदाम्पत्याला देण्याची प्रथा आजही पाळली जाते. तरुण वर्गानेही सक्रिय होत या उत्सवात काळाप्रमाणे बदल केलेत. होळीसाठी म्हणून दरवर्षी ड्रेसकोड असतो. त्यालाही गावकीचा चांगला प्रतिसाद असतो. उत्सव साजरा करताना बदल पाहिजेत. आतापर्यंत तन,मन, धनाने माझा सहभाग असतोच तो नेहमीच असेल.
