युध्दामुळे आखाती देशांमध्ये जाणारी शहापूरतील भेंडीची निर्यात ठप्प
अविनाश उबाळे
ठाणे : अमेरीका,इस्रायल,इराण यांच्यातील युध्दजन्य अशा परिस्थितीमुळे पश्चिम आशियात युध्दाची व्याप्ती वाढली आहे.त्याचे परिणाम आयात निर्यातीवर झाले आहेत भारतातून विशेषता महाराष्ट्रातील ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातून आखाती देशात एक्सपोर्ट होणाऱ्या भेंडीची निर्यात पुर्णपणे ठप्प पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
ही युध्दजन्य परिस्थिती कधी थांबेल याकडे शेतकरी व व्यापारी डोळे लावून बसले आहेत.निर्यात थांबल्याने मोठ्या प्रमाणावर रोज भेंडीचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती भेंडीची आवक वाढल्याने विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणलेल्या भेंडीचा साठा पडून आहे.शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेल्या हिरव्यागार भेंडीला तसेच कारली,काकडी,व भोपळा,डांगर व अन्य भाजीपाल्याला इराण,युरोप, ब्रिटन अफगाणिस्तान, दुबई तसेच आखाती देशांमध्ये मोठी मागणी आहे. गेली अनेक वर्षे शहापूरची भेंडीला परदेशात मागणी आहे.खास करुन भेंडीची निर्यात येथून थेट परदेशात होते पण अचानक युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचे परिणाम हवाई वाहतूक व सागरी वाहतूकीवर झाले आहेत.परिणामी महाराष्ट्रातील भाजीपाला निर्यात ठप्प झाली आहे. विशेषता शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी आणलेली भेंडी सध्या पडून आहे.आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे परदेशात होणारी आयात निर्यात ही पुर्णपणे कोलमडून पडल्याने सध्या व्यापारी हे भाजीपाला खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येत नसल्याने याचा मोठा फटका सामान्य गरीब शेतकऱ्यांना बसला असून उत्पन्नाचे एकमेव साधन असलेला भाजीपाला व्यवसाय हा आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. अगदी कवडीमोल भावाने भेंडी व अन्य भाजीपाल्याची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे. भाजी मालाला उठावच नसल्याने तो खराब झालेला भाजीपाला एकतर फेकून द्यावा लागेल अशी एकंदरीत परिस्थिती येथे निर्माण होण्याची शक्यता आहे.
-शहापूरच्या बाजारपेठेत रोज एक ते दोन हजार क्विंटल भेंडीची आवक होत असून किलोमागे शेतकऱ्यांना ३५ ते ४० रुपयांचा भाव मिळतो आहे.शहापूर तालुक्यात या वर्षी भेडीचे सर्वाधिक विक्रमी उत्पन्न झाले आहे.त्यामुळे कृषी उत्पन बाजार समितीमध्ये आवक वाढली असून वाशी, दादर येथील मोठे व्यापारी खरेदीसाठी येथे येतात.जागेवरच शेतकऱ्यांना किलोमागे ३५ ते ४० रुपयांचा दर मिळत असतो या भागातील भेंडी उत्पादक शेतकरी भेंडीचे व्यवस्थित पॅकिंग करून त्याचा दर्जा चांगला ठेवण्यावर भर देतात पुढे ही भेंडी परदेशात निर्यात होत असते.पण युद्धजन्य परिस्थितीमुळे हा सर्व भाजीपाला कृषी समितीच्या गोडाऊनमध्ये पडून आहे.
६०० हेक्टरमध्ये भेंडीची लागवड
या वर्षी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहाशे हेक्टरमध्ये भेंडीची लागवड केली आहे.दरवर्षी साधारण दोन ते तीन लाख रुपयांची कमाई शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीतून होत असून या पिकाला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याचे बेडीसगाव येथील शेतकरी मधूकर विशे यांनी सांगितले.
