लोकशाही दिनातील अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
अशोक गायकवाड
रत्नागिरी : लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत तसेच कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ, नागरिक व महिला यांना सन्मानाची वागणूक द्या व त्यांची कामे तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जिंदल यांनी मागील प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. नव्याने दाखल अर्जांबाबत काय कार्यवाही केली याबाबतही संबंधित विभागाने अहवाल देण्याबाबत सांगितले. कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ, नागरिक व महिला यांना सन्मानाची वागणूक द्या. त्यांची कामे तात्काळ पूर्ण करा. याबाबत हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. आजच्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नगर परिषद, तहसिलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन कार्यालय असे एकूण ६ अर्ज दाखल झाले आहेत.
