‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे मार्गदर्शन

रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करुन ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची प्रचार प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी. १० वी, १२ वी मुलींसाठी कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करुन एमपीएससी, युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मल्लीनाथ कांबळे, परिविक्षा अधिकारी अनिल माळी आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. मुलांप्रमाणे मुलींनाही समान दर्जा प्राप्त करुन देणे, स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण समान करणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, स्त्री भ्रूण हत्या रोखणे, मुलींना संरक्षण पुरविणे, बालिकेच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे, मुलीच्या जन्माबाबत सकारात्मक विचार निर्माण करणे, शिक्षणासाठी मुलींना अधिकाधिक प्रोत्साहित करणे, बालिकेच्या शिक्षणाबाबत खात्री देणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. पोलीस पाटील, सरपंच, निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांचे पीसीपीएनडीटी, पोक्सो, आरटीई बालविवाह या विषयांवर प्रबोधन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी जिंदल यांनी योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत सांगितले. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ कृती आराखडा २०२५-२६ ला मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *