समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार
डॉ. हर्षदीप कांबळे यांचे प्रतिपादन
चवदार तळे सत्याग्रह दिनी बार्टीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम
अलिबाग : (अशोक गायकवाड )- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्क मिळवून देण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. तो लढा समतेसाठी, स्वाभिमानासाठी न्यायासाठी होता. या समतेच्या संगराला पुढील वर्षी शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. यानिमित्त वर्षभर सामाजिक न्याय विभागाच्यामार्फत समतेचा जागर सुरू राहणार, असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्यावतीने महाड येथील राष्ट्रीय स्मारकामध्ये बार्टीच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या लढ्यात सर्व जातीधर्मातील लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ दिली. चवदार तळ्याचा लढा हा मानव मुक्तीचा होता. चवदार तळ्यातील पाणी स्वच्छ करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ५५ कोटी रुपये मंजूर केले असून ते पाणी जल शुद्ध प्रकल्पाद्वारे शताब्दी पूर्वी पिण्यायोग्य होईल. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय खाते कटिबद्ध असून आपण सर्वांनी डॉ बाबासाहेबाचा समतेचा लढा पुढे नेण्यासाठी आपण एकत्र येऊन पुढे नेवू या, असे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांनी बार्टी आयोजित चवदार तळे सत्याग्रह दिन अभिवादन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले. २० मार्च भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील सभागृहात चवदार तळे सत्याग्रह दिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजकल्याणच्या आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ -मुंडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, उपायुक्त भंडारे, लवटे, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, बार्टीच्या निबंधक डॉ सुचिता शिंदे, विभागप्रमुख रविंद्र कदम, शुभांगी पाटील, डॉ.बबन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.कांबळे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी जो सत्याग्रह केला तो सत्याग्रह नुसता पाण्याचा नव्हता तर तो स्वाभिमानाचा होता. समाजात समता प्रस्थापित करण्याचा होता. त्याच वाटेवर सामाजिक न्याय विभाग काम करत आहे.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक नवीन उपक्रम सुरू असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतलेल्या लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आंबेडकर अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तिथे आपली मुले संशोधन व अभ्यास करतील. आपल्या मुलांनी यशस्वी होण्यासाठी अविश्रांत मेहनत करा, मेहनतीमुळेच आपण आपल्या जीवनात यशस्वी होतो, असा प्रेरक संदेश त्यांनी दिला. यावेळी डॉ.हर्षदीप कांबळे लिखित “मी महाडचे चवदार तळे बोलतोय” ही अत्यंत प्रेरक अशी चित्रफीतही दाखवण्यात आली. आभार व्यक्त करताना समाजकल्याणच्या आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ -मुंडे यांनी समाजकल्याण व बार्टीच्या विविध योजनेचा समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन उच्च शिक्षण घ्यावे, तसेच आपले भविष्य घडवावे, असे आवाहन केले. क्रांतीस्तंभ येथील मुख्यमंचावर बार्टीच्या वतीने प्रसिद्ध गायक कुणाल वराळे, शाहीर शहीद खेडकर, हर्षद कांबळे यांनी “पाऊले या क्रांतीच्या” भीम गीतांच्या माध्यमातून चवदार तळ्याच्या संघर्षमय आठवणीला उजाळा दिला. महाड स्मारकात गायक अशोक गायकवाड यांनी “रथ भीमाचा नेऊ पुढे” हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. तसेच लेखक -दिगदर्शक- निर्माता राहुल जोंधळे लिखित “निळी टोपी” व दर्शन महाजन निर्मित संविधानावर आधारित “राष्ट्रग्रंथ” हे ४० कलाकारांचा संच असलेली नाटके सादर केली. बार्टी संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांचे मौल्यवान ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली होते. त्याचे उद्घाटनही प्रधान सचिव डॉ.कांबळे यांनी केले. याप्रसंगी समाजकल्याण व बार्टीतील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्यभरातून आलेले भीम अनुयायी, विविध क्षेत्रातील मान्यवर” बार्टीचे समतादूत, तालुका समनव्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, डॉ.सारिका थोरात, महाड व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, जनसंपर्क अधिकारी लीना कांबळे यांच्यासह बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ.बबन जोगदंड यांनी केले.
