फुले – आंबेडकर – गाडगे महाराज यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला
सुनील कदम यांचे प्रतिपादन
अभिनव महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह
अरविंद जोशी
मिरा – भाईंदर : ‘महात्मा फुले हे त्या काळातील मोठे उद्योजक होते. ते रोड कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी मुंबईतील अनेक इमारती बांधल्या. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त काम फुले यांनी केले. शेतमालाच्या मार्केटिंगचं काम त्यांनी केलं. समाजातील अंधश्रद्दा दूर करण्याचं काम फुले, संत गाडगे महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. फुलेंच्या कार्याचा गौरव म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. संत गाडगे महाराजांनी देव दगडात नाही, तर माणसात आहे हे सांगितलं. या महापुरुषांचा विचार आजच्या परिप्रेक्षात समजून घ्यावा लागेल,’ असे प्रतिपादन समान संधी अभियानाचे प्रणेते सुनील कदम यांनी केले. भाईंदर येथील अभिनव महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह आयोजित करण्यात आला होता, त्यानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र गीतानंतर पाहुण्यांचा परिचय प्रा. राजेश सोनवणे यांनी करून दिला. त्यानंतर प्रा. वैष्णवी पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी कॅप्टन अजित खेडकर, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष किरण पाटील व प्राचार्य डॉ. ऑल्विन मेनेजिस यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास मिडिया विभाग प्रमुख प्रा. उत्तम भगत यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी उपस्थित होते. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अमोल पाटील, कार्यवाह मंगेश पाटील, सहकार्यवाह प्रकाश पाटील, खजिनदार अशोक पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष विष्णू पाटील तसेच सर्व कार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
