मुंबई : राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी अपेक्षा होती . पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना शेवटच्या क्षणी प्रतिक्षा यादीवर ठेवण्यात आले. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना संधी दिल्याने, गोगावले पुन्हा एकदा मंत्री पदाच्या प्रतीक्षेत राहिले आहेत. लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल असा आशावाद ते सतत व्यक्त करत राहीले. मात्र शेवटपर्यंत गोगावले यांची मंत्री पदावर वर्णी लागली नाही. त्यामुळे आतातरी त्यांना संधी मिळतेय हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, यावरून त्यांनी आज दिलेल्या मुलाखतीत मिश्किल टिप्पणीही केली आहे.
महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले १ लाख १७ हजार ४४२ मतांनी विजयी झाले. तर, त्यांच्याविरोधात असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या स्नेहल जगताप २६ हजार मतांनी पराभूत झाल्या. शिवसेनेत फूट पडल्यापासून भरत गोगावलेंनी शिवसेनेची सातत्याने बाजू सांभाळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सतत उभे राहिले. त्यामुळे आपल्याला नक्कीच मंत्रिपद मिळेल अशी आशा त्यांनी कायम ठेवली. तसंच, मंत्रि‍पदासाठी कोट शिवून घेतला असल्याचंही वक्तव्य त्यांनी मागच्या वेळी केलं होतं. त्यामुळे यंदा तरी त्यांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.
टीका टिप्पणी करणाऱ्यांची तोंडं बंद केली
मंत्रि‍पदाच्या प्रश्नावर भरत गोगावले म्हणाले, मी २६ हजारांनी मी निवडून आलो आहे. टीका टिप्पणी करणाऱ्यांनीही आम्हाला मते दिलीत. फुल्ल स्वींगमध्ये आम्ही आहोत. तिन्ही पक्षाचे चांगले आमदार निवडून आले आहेत. काळजी करण्याचं कारण नाही. टीका टिप्पणी करणाऱ्यांची तोंडं बंद केली आहेत. मी मंत्रीपदाबद्दल या अगोदर बोललो नव्हतो. आता आमचा नंबर असावा असं मला वाटतं.”
कोट
“आताही बॅगेत कोट आणले आहेत. चार कोट आणले आहेत. हवंतर तुम्हाला दाखवतो. काळजी करण्याचं कारण नाही. कोटावर कोणी जाऊ नका, ओठावर जा’’
भरत गोगावले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *