मुंबई : देशात येत्या 25 वर्षात अमृतकाल साजरा करू, त्यावेळी आपल्या देशातील एकही महिला अशिक्षित राहणार नाही, प्रत्येक महिलेला हवे ते उच्च शिक्षण देता यावे, यासाठी आपली आणि एसएनडीटी विद्यापीठाचीही क्षमता वाढावी असे आपण स्वप्न पाहू या, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले.
विद्यापीठातील डॉ. बाबाासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. यावेळी अध्यासनाचे प्रमुख डॉ. संजय शेडमाके, विद्यापीठ कर्मचारी परिषदेचे पदाधिकारी, प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. चक्रदेव पुढे म्हणाल्या, महात्मा फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां महापुरूषांनीसमाज बदलायला हवा हे जाणले, यासाठी प्रत्येकानी विविध मार्ग स्वीकारले त्यात महिला ही एक केंद्रबिंदू आहे. शिक्षणाचे महत्व केवळ समाज बदलदंड होणे या पलीकडे माणूस बदलणे हा एक आहे. मी कोण आहे, माझे काय अधिकार आहेत, हे यातून कळते, यातून शिकता येते.
भगवतगीतेतील दहाव्या अध्यायातील ३४व्या श्लोकातील तिसऱ्या ओळीत भगवान श्रीकृष्णाने महिलांसाठी सात गुण सांगितलेले आहेत. हे सात गुण आपण जाणलो नाही तर आपण आपले अधिकार जाणू शकत नाही, यामुळे आपले महत्व जाणून घेणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.
महिलांच्या सबलीकरणासंदर्भात कुलगुरू डॉ. चक्रदेव म्हणाल्या, सबलीकरण हे आतून येते ते शिक्षणातून घडते. आपल्या विद्यापीठात शिक्षणातून महिलांचे सबलीकरण तोच विद्यापीठाचा उद्देश आहे.
मात्र, यासाठी सगळ्यांनी एकमेकांचे हात पकडून सहकार्य करावे, ज्यावेळी संधी मिळते, त्यावेळी तिचा पूर्ण लाभ, काळाचा उपयोग करून घ्यावा, महिलांच्या मनामध्ये तू सबल आहेस, तुझ्यासारख्या अनेक महिला भारताममध्ये आहेत, त्यांना तुझी गरज आहे, असे सांगणे आवश्यक असून हाच आपल्या विद्यापीठाचाही उद्देश असल्याचेही त्या म्हणाल्या.
